Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 December, 2008

"रिव्हर प्रिन्सेस' विरोधात कडकडीत बंद व रास्तारोको

पावसाळ्यापूर्वी जहाज हटवा, सरकारला कडक इशारा
म्हापसा व वेर्ला काणका, दि. १७ (प्रतिनिधी) - कांदोळी सिकेरी समुद्रात रुतलेले "रिव्हर प्रिन्सेस' हे तेलवाहू जहाज यंदाच्या पावसाळ्यापूर्वी न हटवल्यास लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा कांदोळी येथील "रिव्हर प्रिन्सेस हटाओ मंच' ने आज आयोजिलेल्या "कांदोळी बंद' आंदोलनप्रसंगी दिला. याप्रसंगी तेथे सुमारे सहा हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. कडकडीत बंद व रास्तारोको यामुळे कांदोळीतील जनजीवन दुपारी एक वाजेपर्यंत पूर्णतः विस्कळित झाले होते. आता यासंदर्भात येत्या २६ डिसेंबरला पुढील बैठक घेण्यात येणार आहे.
कांदोळी गावातील जाणारे सर्व रस्ते आज तीन ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नेरुल पूल, शाळपे व कळंगुट कांदोळी सीमेवर अशा तीन ठिकाणी कांदोळीला जाणारे रस्ते रोखण्यात आले होते. त्यामुळे बेतीवेरेहून नेरुल पुलावरुन येणारी वाहने अडविण्यात आली, तर पिळर्णमार्गे कांदोळीला येणारा रस्ता शाळपे येथे अडविण्यात आला. तसेच कळंगुटहून कांदोळीला जाणारा रस्ता कांदोळी कळंगुट सीमेजवळ जांबळेश्वर देवळापाशी रोखण्यात आला. मंचचे निमंत्रक फर्मिनो फर्नांडिस यांनी सांगितले की, गेल्या जुलै महिन्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कांदोळीला भेट देऊन आपण सप्टेंबर महिन्यापूर्वी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले, परंतु आता सहा महिने होऊन गेले तरी कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने आम्हाला कांदोळी भागाची "नाकेबंदी' करावी लागत आहे.
कळंगुटचे आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी आंदोलकांच्या एका तुकडीचे नेतृत्व केले, तर नेरुल पुलाजवळ जमलेल्या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व कांदोळीचे सरपंच रामकृष्ण केरकर यांनी केले. मंचचे निमंत्रक फर्मिनो फर्नांडिस यांनीही एका तुकडीचे नेतृत्व केले. त्यामुळे संपूर्ण कांदोळीमध्ये कडकडीत बंद होता. सकाळी ९ वाजता रास्ता रोको करण्यास सुरवात झाली. दुपारी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हाधिकारी कांदोळीला पोहचले व त्यांनी आंदोलकांना तुम्हाला वाहतुकीचा रस्ता अडविता येणार नाही. म्हणून आम्हाला अटक करावी लागेल, असे सुनावले. त्यामुळे लोक आणखी चवताळले.
या जहाजचे मालक व संबंधित कंपनी यांच्याविरोधात आंदोलकांनी घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. निषेधाचे फलक हातात घेऊन कांदोळी, सिकेरी, नेरुलचे लोक बंदमध्ये सामील झाले होते. हा बंद अत्यंत उत्स्फूर्त असल्याचे दिसून आले. कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोक प्रथमच रस्त्यावर उतरले होते.
लोकांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. आमच्या गावचा समुद्रकिनारा दूषित झाला असून गावातील विहिरींचे पाणीदेखील दूषित झाले आहे. पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सरकारने आतापर्यंत दोन कंपन्यांना हे जहाज हटवण्याचे कंत्राट दिले. तथापि, दोन्ही कंपन्या असमर्थ ठरल्या. ते काम अर्धवट सोडून त्या गेल्या. त्यामुळे ही परिस्थिती पर्यावरण व सुरक्षा यादृष्टीने घातक आहे. हे जहाज म्हणजे पर्यावरण आपत्ती आहे. त्याकरता ते त्वरित हटवावे, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. अखेर दुपारी १ वाजता हा बंद संपला.
दरम्यान पर्यटन खात्याचे वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी आले व त्यांनी पाहणी केली. कळंगुटचे पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर उपअधीक्षक गुंडू नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विदेशी पर्यटकांचाही सहभाग
या बंदमध्ये विदेशी नागरिक पर्यटकही सहभागी झाले होते. त्यातील एकाने उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावले की, तुम्ही जर आम्हाला अटक करत असाल तर मी प्रथम अटक करवून घेतो. आम्ही गेली आठ वर्षे पर्यटक म्हणून येत आहोत व हे जहाज तेथेच रुतल्याचे पाहात आहोत, असे या पर्यटकाने सांगितले. त्यामुळे उपजिल्हाधिकारी व पोलिस उपअधीक्षक गुंडू नाईक हताश होऊन त्याच्याकडे पाहातच राहिले.

No comments: