नवी दिल्ली, दि. १८ : मुंबईतील भीषण अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानलगत असणाऱ्या सीमेवर सुरक्षा वाढवित सीमा सुरक्षा दलाला "हाय अलर्ट' जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आज संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली. एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एम.एल.कुमावत यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि बांगलादेशलगत असणाऱ्या सीमेवर "हाय अलर्ट' जारी करण्यात आले आहेत. या परिसरात आम्ही तैनाती आणि सतर्कता वाढविली आहे. त्यामुळे आज आम्ही पूर्वीच्या तुलनेत अधिक सतर्क असल्याचे आश्वासन देशाला देऊ शकतो.
सीमा सुरक्षा दल भारत-बांगलादेशच्या ४०९६ किलोमीटर आणि पाकलगतच्या ३२६८ किलोमीटर लांब सीमेचे संरक्षण करतात. पाकिस्तानलगतच्या ३२६८ किलोमीटरच्या सीमेत २५२६ किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४२ किलोमीटर नियंत्रण रेषा समाविष्ट आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकसोबतच्या संबंधात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा दलाची कुमक सीमेवर वाढविली आहे. सध्या पाक सीमेलगत भारताचे ४५ हजार जवान तैनात आहेत.
गेल्या काही दिवसात पाक आणि बांगलादेशी सीमेतून घुसखोरीचे प्रमाण वाढल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ते म्हणाले की, मी या वृत्ताशी अजिबात सहमत नाही. दोन्ही सीमांवर सुरक्षा दलाची तैनाती कायम आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा दल आवश्यक ते सर्व उपाय करीत असल्याचेही महासंचालकांनी सांगितले.
संरक्षणमंत्र्यांची लष्करप्रमुखांशी चर्चा
संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी यांनी आज तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली.
याबाबत माहिती देताना संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह संरक्षण सचिवांशीही चर्चा केली. यात त्यांनी देशाच्या सर्व सीमा अधिक बळकट करण्याविषयीच्या सूचना दिल्या. सोबतच सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. सुरक्षा दलाला अत्याधुनिक हत्यारे आणि उपकरणे देण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
देशाच्या सागरी सीमांवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भातील चर्चेसाठी संरक्षणमंत्र्यांनी येत्या शनिवारी पुन्हा बैठक बोलाविल्याचे समजते.
Friday 19 December, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment