Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 December, 2008

अखेर पाक दौरा रद्द, जनतेतून स्वागत; 'पीसीबी' ला जबरदस्त आर्थिक फटका

नवी दिल्ली, दि. १८ : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तानातील अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा पाकिस्तान दौरा अधिकृतरीत्या रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी') सुमारे २० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
पाकिस्तानचा दौरा रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला गुरुवारी दुपारी निर्देश दिले आहेत. दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या मालिकांसाठी आमच्याकडून बऱ्यापैकी पैसा खर्च झाला आहे. तो सर्व वाया जाईलच शिवाय दूरचित्रवाहिन्यांबरोबर होणाऱ्या प्रक्षेपणाच्या करारावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे "चीफ ऑपरेटिंग ऑफिसर' अलीम अल्ताफ म्हणाले की ,"मोठमोठे दौरे रद्द झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ याआधीच आर्थिक अडचणीत सापडले आहे, त्यात भारताने दौरा रद्द केल्यामुळे तर आमची अवस्था फारच वाईट होईल.'
सध्याच्या परिस्थितीत भारताने पाकिस्तानचा क्रिकेटदौरा करूच नये, अशी जोरदार मागणी क्रिकेटप्रेमींतूनही केली जात होती. कारण, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हे हल्ले झाल्यानंतरही पाकिस्तान सरकारची भूमिका अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे देशातील जनमत सध्या पाकिस्तानच्या विरोधात तप्त झाले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. जर सरकारने सूचना केली तर आम्ही भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर पाठवणार नाही, असे क्रिकेट नियामक मंडळानेही यापूर्वीच स्पष्ट केले होते. आता त्यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमीच नव्हे तर आम जनतेतूनही सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. सद्यस्थितीत पाकिस्तान या नावाबद्दलच लोकांमध्ये विलक्षण तिटकारा निर्माण झाला आहे.

No comments: