Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 December, 2008

"त्या' जखमा आजही ओल्या

ताळगाव हल्ल्याची "वर्षपूर्ती'
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - "आम्ही सारे संकल्प आमोणकर यांच्या पाठीशी आहोत, गरज पडल्यास ताळगावात पुन्हा मोर्चा काढला जाईल, बाबूश मोन्सेरात यांची किती हिंमत आहे तेच बघू" ही डरकाळी हवेतच विरून गेली. कॉंग्रेस सरकारच्या राज्यात त्यांच्याच युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या ताळगावात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर अजूनही ही घटना आठवली की काटा उभा राहतो. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे सोडूनच द्या; उलट या हल्ल्याला जबाबदार असलेल्या लोकांच्या आश्रयानेच आज आपले सरकार सत्तेची फळे चाखताना पाहिल्यावर "राजकारणा' ची खरी ओळख पटली, अशी प्रतिक्रीया युवक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दोनापावला येथील नियोजित राजीव गांधी "आयटी हॅबिटेट" प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध करणारे ताळगावाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नाकावर टिच्चून मोर्चा काढण्याचे आव्हान स्वीकारलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीला उद्या १८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ताळगावात झालेल्या त्या हल्ल्यात युवक कॉंग्रेसचा सचिव चिदंबरम चणेकर जबर जखमी झाला होता. त्याखेरीज जखमी झालेल्यांत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांचे पुत्र आश्विन खलप, जितेश कामत, नारायण रेडकर व अन्य पंधरा कार्यकर्त्यांचाही समावेश होता. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश चढ्ढा व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, नगरसेवक उदय मडकईकर, दया कारापूरकर, नागेश करशेट्टी, सरपंच जानू रुझारीयो, टोनी बार्रेटो तसेच अन्य लोकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. आता मोन्सेरात हे सरकारात शिक्षणमंत्री आहेत, तर आयटी पार्कचे समर्थन करणारे तत्कालीन माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर हे मंत्रिमंडळा बाहेर.
संकल्प आमोणकर यांनी जाब द्यावा
युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता व यावेळी झालेल्या हल्ला प्रकरणी ते तक्रारदार आहेत. त्या तक्रारीचे काय झाले याचा जाब त्यांनी द्यावा,अशी विचारणा चिदंबर यांनी केली. बाकी उर्वरीत काही पदाधिकारी व नेत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणेच टाळले.
खुद्द संकल्प आमोणकर यांच्या फोर्ड गाडीवर त्यावेळी जोरदार दगडफेक करून त्याची गाडी उलथून टाकली होती. यावेळी अन्य चार वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. सुमारे २०० लोकांच्या जमावाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळेल त्या दिशेने जीव वाचवण्यासाठी धावायची पाळी आली होती याचे सचित्र वृत्त वर्तमानपत्रांत तथा वृत्तवाहिन्यांकडून प्रसारीत करण्यात आले होते मात्र "डोळे असूनही आंधळ्याचे सोंग' घेतल्याप्रमाणे आपलेच सरकार वागत आहे याचे दुखःही या घटनेचे साक्षीदार असलेले काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

No comments: