Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 December, 2008

भारत 'जिंकला'

चेन्नई , दि. १५ : 'असाध्य ते साध्य, करिता सायास' ही उक्ती "टीम इंडिया'ने आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सार्थ ठरवली . वीरेंद्र सेहवाग - गौतम गंभीर या सलामीवीरांनी रचलेल्या पायावर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी कळस चढवला. इंग्लंडचे ३८७ धावांचेआव्हान अशक्य नसले, तरी कठीण नक्कीच होते. पण भारताच्या रथी - महारथींनी ते पार करून दाखवले. ग्रॅमी स्वॅनच्या चेंडूवर पॅडल स्वीप करत सचिन तेंडुलकरने भारताचा विजय साकारला आणि कसोटी क्रिकेटमधले स्वतःचे ४१ वे शतकही साजरे केले . हे सारे पाहून, क्या से क्या हो गया असे गुणगुणत पीटरसन अँड कंपनीने कपाळावर हात मारून घेतला. भारताचा हा विजय म्हणजे टीम वर्क असले, तरी वीरेंद्र सेहवागने केलेल्या तडाखेबंद खेळीमुळेच, जिंकण्यासाठी खेळण्याची प्रेरणा टीम इंडियाला मिळाली होती . त्यामुळेच ६८ चेंडूत ८३ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या 'वीरू'ला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरविण्यात आले. अँड्र्यु स्ट्रॉसची दोन्ही डावातील शतकी खेळी व्यर्थच ठरली. खेळपट्टीची साथ नसतानाही, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी १६३ धावांची भागीदारी रचून इंग्लंडचे सगळे मनसुबे उधळून लावले . इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यामुळे कसोटी मालिकेतही भारताचे पारडे जड होते. पण चेन्नई कसोटीचे पहिले साडेतीन दिवस सगळे उलटच घडत होते. अँड्र्यु स्ट्रॉसच्या शतकाच्या जोरावर पाहुण्याची ३१६ धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडियाचा फॉर्म पाहता , ३१६ धावा म्हणजे अगदीच सोप्या होत्या. पण , महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंगचा अपवाद वगळता , धोनीचे सारे धुरंधर पहिल्या डावात अपयशी ठरले. २४१ धावांतच भारताचा डाव आटोपला आणि सगळे चित्रच पालटून गेले .

No comments: