Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 December, 2008

"कंत्राटी कामगार पद्धत रद्द करा'

कामगार संघटनेची उद्या पणजीत महारॅली
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)ः गोव्यात असंघटित कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू आहे. कंत्राटी नेमणुकीच्या नावाखाली कामगारांचे शोषण सुरू असून खुद्द राज्य सरकारही त्याला अपवाद नाही. ही कंत्राटी पद्धत बंद होण्याची नितांत गरज असून येत्या १९ रोजी गोवा मुक्तिदिनानिमित्त कामगार संघटनेकडून काढण्यात येणाऱ्या महारॅलीत "राज्यातील कंत्राटी कामगारांना मुक्त करा' अशी घोषणा दिली जाणार आहे.
आज पणजी येथील "आयटक' कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव राजू मंगेशकर यांनी ही माहिती दिली. यावेळी या रॅलीचे सहआयोजक असलेल्या कामगार संघटनेच्या युवा शाखेचे अध्यक्ष ऍड. सुहास नाईक व सचिव जॉन क्लार्क उपस्थित होते. पणजी येथील कदंब बसस्थानकावरून ही रॅली सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे व तदनंतर आझाद मैदानावर त्याचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी काही दिवसांपूर्वी रोजंदारी वेतनात रु. ११० वरून रु. १५० पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती व त्यासाठी गेल्या १२ डिसेंबर रोजी बैठकही बोलावली होती. काही उद्योजकांनी दबाव आणल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोव्यात कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना केवळ कामानिमित्त वापरून वस्तू बाहेर फेकल्याप्रमाणे कामावरून कमी केले जाते, अशी टीकाही यावेळी श्री. मंगेशकर यांनी केली. खासगी पातळीवर अशा पद्धतीने कामगारांचे शोषण सुरू आहेच परंतु प्रशासकीय पातळीवर सरकारी खात्यात दहा ते पंधरा वर्षे नियमित कामासाठी कंत्राटी कामगार वापरून सरकारच त्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कंत्राटी कामगारांनाही कायद्याप्रमाणे काही आर्थिक संरक्षण बहाल करण्यात आले आहे. त्याची विविध उद्योजकांकडून अंमलबजावणी होत नाही व कामगार खाते डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे, असा घणाघाती आरोपही यावेळी करण्यात आला. राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत ८० टक्के कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून त्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने रोजगाराच्या बाता मारणाऱ्या सरकारकडून त्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही यावेळी श्री. मंगेशकर यांनी केला.
विविध कामगारांच्या समस्या, अडचणी व सत्य परिस्थितीचे दर्शन १९ रोजीच्या महारॅलीत प्रतिबिंबित होणार आहे. सध्या आर्थिक मंदीच्या निमित्ताने विविध आस्थापनांकडून व उद्योजकांकडून कामगारांना कमी करण्याचा सपाटा सुरू आहे. यावेळी अनेकजण कारण नसताना या परिस्थितीचा फायदा उठवून नियमित कामगारांना कमी करण्यात गुंतले असून सरकारने त्याची दखल घेण्याची गरज असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

युवा संघटनेतर्फे १९ रोजी जठा
अखिल भारतीय युवा फेडरेशनतर्फे जठा (वाहन यात्रा) आयोजित करण्यात आली असून त्याचा शुभारंभ १९ रोजी कदंब बसस्थानकावर होणार आहे. वाढती महागाई, अमेरिका अणुकरार, जातीयवाद, दहशतवाद व कंत्राटी कामगार पद्धत याविरोधात या यात्रेत जनजागृती करण्यात येईल. यानिमित्त कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा व पश्चिम बंगालच्या नागरी सुरक्षा खात्याचे राज्यमंत्री डॉ. श्रीकुमार मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ही रॅली दक्षिणेतील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व केरळ येथपर्यंत जाणार आहे.

No comments: