Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 March, 2011

११ दोषींना ‘सजा-ए-मौत’

गोध्रा जळितकांड प्रकरणी
२० दोषींना जन्मठेप - साबरमती विशेष न्यायालयाचा निर्णय
अहमदाबाद, द. १ : साबरमती एक्सप्रेसमधील ५९ कारसेवकांचे बळी घेणार्‍या २००२ मधील गोध्रा जळितकांड प्रकरणाचा बहुप्रतीक्षित फैसला साबरमती विशेष न्यायालयाने आज सुनावला. या प्रकरणी ३१ पैकी ११ दोषींना न्यायालयाने ‘सजा-ए-मौत’ अर्थात फाशीची, तर उर्वरित २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज ठोठावली. गोध्रा येथील जळितकांड हे संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या गुजरातमधील जातीय दंगलींची ठिणगी ठरली होती. या प्रकरणातील ६३ आरोपींची न्यायालयाने यापूर्वीच पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.
‘‘हे जळितकांड दुर्मिळातले दुर्मीळ असेच आहे. या जळितकांडातील ११ आरोपी ङ्गाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत. तर, उर्वरित आरोपींना आपले न्यायालय जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे,’’ असे विशेष न्यायाधीश पी. आर. पटेल यांनी साबरमती कारागृहात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात आपला निकाल जाहीर करताना म्हटले. हा निकाल ऐकण्यासाठी लोकांनी न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती.
‘‘कारसेवकांचे हत्याकांड घडविण्यासाठीच दोषींनी हे भीषण षडयंत्र रचले. गोध्राजवळ या दोषींनी साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ या डब्याला आग लावली आणि ५९ कारसेवकांचे बळी घेतले. या हत्याकांडात सक्रिय सहभागी असलेल्या दोषींना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे,’’ अशी माहिती निकाल जाहीर झाल्यानंतर विशेष सरकारी वकील जे. एम. पांचाल यांनी दिली.
ङ्गाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने विविध कलमांखाली जन्मठेपेचीही शिक्षा ठोठावली आहे. ‘‘हे हत्याकांड अतिशय भीषण आणि नृशंस असल्याने सर्व ३१ दोषींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात यावी,’ अशी जोरदार मागणी सरकारी पक्षाने केली होती.
गोध्रा जळितकांडामागे मोठे षडयंत्र असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने गेल्या २२ ङ्गेबु्रवारी रोजी ३१ आरोपींना या प्रकरणात दोषी ठरविले होते आणि पुराव्यांअभावी ६३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. दोषी आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमांतर्गत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ११ आरोपींना ङ्गाशीची शिक्षा आणि २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावतानाच न्यायालयाने या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याची मुभाही आरोपींना दिली आहे.
ङ्गाशीची शिक्षा झालेले दोषी
रज्जाक कुरकुर, सलमान जर्दा, इरङ्गान कलंदर, इरङ्गान पातडियाला, सिराज बेहला, हाजी बिलाल, मेहबूब लतिका, रमजानी बेहराला, जाबिर बेहराला, सिराज बालाला, मेहबूब चांदा.
----------------------------------------------------------------
‘‘हे जळितकांड दुर्मिळातले दुर्मीळ असेच आहे. या जळितकांडातील ११ आरोपी ङ्गाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत. तर, उर्वरित आरोपींना आपले न्यायालय जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे,’’- न्या. पी. आर. पटेल

No comments: