Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 March, 2011

कुडचडेत ट्रकमालकांचा भव्य मोर्चा

मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी

- आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
- खनिज मालवाहतूक सुरू करणार
- ‘तालांव’ दिल्यास महामार्ग रोखणार

कुडचडे, दि. ३ (प्रतिनिधी)
खनिज मालवाहतूक करणार्‍या ट्रकमालकांना सतावण्याचे सत्र सरकारने सुरू केल्याचा दावा करून संतप्त झालेल्या ट्रकमालकांनी आज कुडचड्यात आलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भव्य मोर्चा काढला. कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री कामत आले असता गेले चार दिवस खनिज मालवाहतूक बंद ठेवलेल्या ट्रकमालकांनी आपला रोष अतिशय जळजळीत पद्धतीने व्यक्त करताना सरकारी धोरणांवर सडकून टीका केली.
ट्रकांच्या हौदाला बसवण्यात येणारी ९ सें.मी.च्या पट्टीचे निमित्त करून वाहतूक खात्याने ‘तालांव’ देण्याची मोहीम आखून ट्रकमालकांच्या पोटावरच पाय देण्याचे धोरण अवलंबले आहे. ते त्वरित थांबवले नाही तर तमाम खनिज ट्रक नेऊन गोव्यातील महामार्गांवर ठेवले जातील असा कडक इशाराही यावेळी ट्रकमालकांनी दिला. नव्यानेच स्थापण्यात आलेल्या ट्रकमालक कृती समितीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी दीड हजारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या ट्रकमालकांनी मुख्यमंत्री कामत यांची हुर्यो उडवली. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सरकार चालवण्यास असमर्थ असल्याची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. कुडचडेच्या साग मैदानावर आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मत, गृहमंत्री रवी नाईक, आमदार आलेक्स सिक्वेरा व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सदर मोर्चा ‘साग’ मैदानाजवळ पोहोचला असता केपे उपअधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक भानुदास देसाई, सुदेश नार्वेकर, सागर एकोस्कर यांच्यासह उपस्थित असलेल्या पोलिस फौजफाट्याने तो रोखला. मात्र ट्रकमालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत माघारी न वळण्याचा निर्णय घेतला. शेवटी ट्रकमालकांचा रेटा पाहून मुख्यमंत्र्यांनी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची भेट घेतली व उद्या शुक्रवारी एक खास बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरच मोर्चा माघारी वळला.
दरम्यान, ट्रकमालकांनी उद्यापासून मागची फळी न काढता मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला असून वाहतूक खात्याने तरीही सतावणूक सुरूच ठेवल्यास गोव्यातील सर्व महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे.

No comments: