Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 February, 2011

आरोग्यमंत्री गोव्याचे की सत्तरीचे?

आमोण्यातील सभेत नार्वेकरांचा सवाल
आमोणे, दि. २७ (वार्ताहर): गोव्याचे आरोग्यमंत्री आपल्या कार्यकाळात २२०० बेरोजगारांना नोकरीला लावल्याचे सांगतात. मात्र त्यातील पाळी व डिचोली मतदारसंघातील केवळ ३० जण आहेत उर्वरित सर्वजण हे सत्तरी मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हे आरोग्यमंत्री गोव्याचे आहेत की केवळ सत्तरीचे आहेत असा सवाल हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी केला आहे. आमोणे येथील महालक्ष्मी रवळनाथ मंदिराच्या पटांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ऍड. नार्वेकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रकाश फडते, माजी आमदार ऍड. विष्णू नाईक, सरपंच शंकर नाईक, खेमलो सावंत, वेळग्याचे दिनेश सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऍड. नार्वेकर यांनी सरकारच्या पीपीपी तत्त्वावर कडाडून टीका केली. ऍड. नार्वेकर म्हणाले की, सरकारने डिचोली मतदारसंघातील मये तलाव हा एका बड्या हॉटेल मालकाला पीपीपी तत्त्वावर देण्याचा डाव आखला आहे. त्याचप्रमाणे कळंगुट बागा येथील ५२ हजार स्क्वे. मी. जागा पीपीपी तत्त्वावर देण्याचा घाट रचला आहे. यासाठी वीस वर्षांचा करार केला असून वीस वर्षानंतर सदर जागा ही त्याच मालकाकडे जाणार आहे. त्याचप्रमाणे साकवाळ वास्को येथील नैसर्गिक झरा २८०० स्क्वे. मी. जागाही पीपीपी तत्त्वावर बड्या उद्योजकाकडे देण्याचा घाट आहे. सरकारी मालमत्ता पीपीपी तत्त्वावर देऊन नंतर ती विकण्याचा कुटील डाव गोमंतकीयांनी हाणून पाडला पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री. नार्वेकर यांनी केले.
पुढे बोलताना ऍड. नार्वेकर म्हणाले की, मी कॉंग्रेसचा आमदार व सक्रिय कार्यकर्ता असलो तरी या चार वर्षात सरकारने ‘पीपीपी’ उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीला काळिमा फासणारे हे कृत्य असल्याने मी या विरुद्ध आवाज उठवला आहे. मागील दाराने येणार्‍या कॉंग्रेस सत्ताधारींना धडा शिकवण्यासाठी हा उपक्रम मी राबवीत आहे.
यावेळी त्यांनी खाण वाहतुकीविरोधातही आवाज उठवताना गोव्यात आज खाण कंपन्यांत कुरघोडी करत असून त्यामुळे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. पुढे श्री. नार्वेकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकण्याचा हा घाला परतवून लावण्यास नागरिक सज्ज आहेत. या भागातील प्रदूषणामुळे क्षयरोगी रुग्णांत वाढ झालेली आहे. तसेच आमोणे, खांडोळा, बेतकी, माशेलमधील मुले जन्मतःच अस्थमा घेऊन येत आहेत. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे आवाहन करताना आपल्या पुढील सभा काणकोण व मडगाव येथे आयोजित केल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते प्रकाश फडते यांनी नार्वेकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमास पाठिंबा असल्याचे सांगितले तर ऍड. विष्णू नाईक यांनी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच कोणत्याही प्रकरणावर कारवाई होते. मग सरकार कशासाठी असा सवाल केला. यावेळी सरपंच शंकर नाईक व श्री. सहस्त्रबुद्धे यांनीही आपले विचार मांडले.
खेमलो सावंत यांनी प्रास्ताविक केले. व नंतर आभार मानले.

No comments: