Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 March, 2011

पडोसे पाणी प्रकल्पातील कामगारांचे आंदोलन मागे

* भाजप युवा मोर्चाचा पुढाकार
* तांत्रिक साहाय्यक महिन्यासाठी निलंबित
* ७०० कामगारांना सुविधांचा लाभ मिळणार

डिचोली, दि. १ (प्रतिनिधी): भाजप युवा मोर्चाने घेतलेल्या पुढाकारामुळे पडोसे पाणी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या ३५ कामगारांबरोबरच राज्यातील इतर ७०० कंत्राटी कामगारांची समस्या सुटली आहे. या कामगारांनी आज आपले धरणे आंदोलन मागे घेतले. मात्र, डिचोली शहरातील पाण्याच्या टंचाईची समस्या सलग सहाव्या दिवशीही सुटलेली नाही. दरम्यान, या प्रकल्पातील तांत्रिक साहाय्यक संभाजी राणे यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची योग्य निगा न राखल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी त्यांना एक महिन्यासाठी निलंबित केले आहे. कामगारांनाही त्यांनी सक्त ताकीद दिली.
आज सकाळी मंत्री श्री. आलेमाव यांनी पडोसे पाणी प्रकल्पाला भेट दिली. कामगार कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्यांना संपावर जाता येत नाही. यापुढे त्यांच्याकडून असे वर्तन घडल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी कामगारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी भगवान हरमलकर व भालचंद्र नार्वेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व कार्यकारी अभियंते श्री. कमलादिनी यांच्याशी बोलणी करण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी मागणी धुडकावून लावताच या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. तद्नंतर श्री. पर्रीकर यांनी अभियंते श्री. रेगो यांची भेट घेऊन कामगारांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडली व निवेदन सादर केले. त्याची दखल घेऊन कंत्राटी कामगारांना २०११ पासून वेतनाची वाढीव थकबाकी, पी. एफ., ईएसआय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. राज्यातील ७०० कामगारांनाही या सुविधांचा लाभ मिळणार आहे. परिणामी कर्मचार्‍यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, उत्तर गोव्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईला सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments: