Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 March, 2011

वर्ल्डकपच्या धुमश्‍चक्रीत बारावीची परीक्षा

सोमवारी पहिला पेपर - दहावीची परीक्षा ३० मार्चपासून
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): भारतीय उपखंडात आयोजित केलेली व संपूर्ण देशावर जबरदस्त मोहिनी घातलेली विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा ऐन जोशात येत असतानाच राज्यातील दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र दूरदर्शन संच बंद करून अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कारण सोमवार दि. ७ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे तर ३० मार्चपासून दहावीच्या मुलांची ‘कसोटी’ लागणार आहे.
गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली असून नियोजित कार्यक्रमानुसार बारावीच्या परीक्षा सोमवार दि. ७ मार्चपासून सुरू होत असून १३ केंद्रांतून घेतल्या जाणार्‍या या परीक्षेला राज्यातील एकूण १३,७६५ विद्यार्थी बसणार आहेत. तर, ३० मार्चपासून २४ केंद्रांतून घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला १६,७७५ विद्यार्थी आपले शैक्षणिक कौशल्य पणाला लावणार आहेत, अशी माहिती गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.
विश्‍वचषकाचा परीक्षांवर परिणाम शक्य
दरम्यान, एका बाजूला आबालवृद्धांचा आवडता खेळ असलेल्या क्रिकेटची महास्पर्धा तर दुसर्‍या बाजूला शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाची बरीच घालमेल होणार असून पुस्तकात तोंड खुपसून बसलेले असतानाही कोण जिंकले आणि कोण हरले याचा विचार त्यांचा सारखा पिच्छा पुरवणार आहे. परीक्षेच्या धामधुमीतच विश्‍वचषक स्पर्धेतील महत्त्वाचे सामने खेळले जाणार असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments: