Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 March, 2011

गोव्यातील ड्रग्ज व्यवसायाला आवरा

खा. श्रीपाद नाईक यांची लोकसभेत मागणी
पणजी, दि. २ : गोवा हे देशातील एक लहान व सुख-शांतीमय राज्य असून आज हेच राज्य ड्रग्ज माफियांमुळे एक अशांत प्रदेश बनत चालला आहे. येथे दर दिवशी किलोकिलोभर गांजा, चरस तसेच अन्य अमली पदार्थ पकडले जात आहेत. या वाढलेल्या ड्रग्ज व्यवसायामुळे गोव्यात येणार्‍या पर्यटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे, असे प्रतिपादन करून या ड्रग्ज व्यवहारांना त्वरित आवर घालण्याची मागणी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.
गोव्यात वाढलेल्या या अमली पदार्थ व्यवहारांमुळे गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसत असून या व्यवहारांतून पर्यटकांच्या हत्याही होण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या व्यवहारांना वेळीच आवर घातला नाही तर सुंदर राज्य म्हणून ओळखला जाणारा गोवा येणार्‍या काळात बरबाद होऊन जाईल, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अमली पदार्थांमुळे येथील युवा पिढी बरबादीच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. त्यातच खेदाची गोष्ट म्हणजे ज्यांनी या प्रकारांना आळा घालायला हवा ते पोलिसच ड्रग्ज व्यवहारांत गुंतल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. या प्रकरणांवरून काही पोलिस बडतर्फही झाले आहेत. त्यामुळे गोव्यात फोफावत चाललेल्या या अनिष्ट व्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी श्रीपाद नाईक यांनी मांडले.

No comments: