Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 February, 2011

लिबियातील भारतीयांच्या थरारक आठवणी...!

नवी दिल्ली, दि. २७ : लिबियातील भारतीय सुरक्षितपणे मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर तणावरहित आनंद दिसून येत होता. गेल्या दोन आठवड्यांत लिबियात चाललेल्या सरकारविरोधी हिंसाचाराच्या थरारक आठवणी अजूनही ताज्या असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होते. या घटनांबद्दलची भीती त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येत होती. तेथील लूट, हिंसाचार आपल्या डोळ्यांनी बघितलेले अनेकजण लिबियातील ङ्गा थरारक आठवणींना इंदिरा गांधी विमानतळावर गोळा झालेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीसमोर उजाळा देत होते.
केरळमधील कोची येथील रहिवासी असणारे मुहम्मद सली गेल्या ३१ वर्षांपासून लिबियात राहत होते. ते या घटनेविषयी सांगतात की, लिबियातील परिस्थिती भडकल्यानंतर लोक कित्येक दिवस अन्न-पाण्याशिवाय जगत होते. ज्यावेळी लिबियातील हिंसाचार पराकोटीला पोहोचला तेव्हा लोक जगण्यासाठी घाबरत होते. मी आणि माझ्याबरोबर काही भारतीय दोन दिवस एका कॅम्पमध्ये राहिलो आणि काही लोकांनी आमच्या लॅपटॉप व मोबाईलसारख्या वस्तू लुटल्या. इंजीनिअर असलेल्या सली यांनी सांगितले की, लिबियात कोणताही कायदा चालत नाही. त्रिपोली येथील अनेक पोलिस स्टेशन हिंसाचारादरम्यान जाळण्यात आले होते. स्थानिकांनी खूप लूट केली.
एका बांधकाम कंपनीतील सुताराचे काम करणारा करमवीर सांगत होता की, लिबियातील परिस्थिती शांत झाली तरी तो पुन्हा परत जाऊ इच्छित नाही. तिथली परिस्थिती अतिशय वाईट होती. लोक लुटालूट करत होते. वेळ पडली तर ते हत्या करायलादेखील सरसावत होते. पोलिस नाही व संरक्षणही नाही, अशी स्थिती होती.
डॉ. नवबीर या काही वर्षांपासून लिबियात एकट्याच राहत होत्या. त्या आपले अनुभव सांगताना म्हणतात, हिंसाचार चालू होण्याअगोदर मी परदेशात असल्याची भावना कधीच निर्माण झाली नाही. मला त्या देशात कधीच असुरक्षित वाटले नाही. मी भारतात परतत असताना अनेकांनी मला थांबविले. त्या म्हणाल्या की, त्रिपोली विमानतळावर पोहचण्यासाठी लोक १० तास रांगेत उभे होते. विमानतळावर लांबचलांब रांगा होत्या आणि प्रवेशद्वारापासून चेक काऊन्टरपर्यंत पोहचण्यासाठी १५ तास लागले.
उत्तर प्रदेशातील बीजनोरचे रहिवाशी असणार्‍या मोबीन कुरेशी यांची कहाणी काही वेगळीच आहे. ते राहत होते तिथे एकही घर वाचले नव्हते. सर्व घरे जळून गेली होती. अन्नपाण्यावाचून त्यांना बरेच दिवस राहावे लागले. त्यांचे पैसे, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.
परंतु, त्रिपोलीजवळ असणार्‍या गावातील हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या हैदराबादच्या सज्जनलाला यांनी मात्र लिबियन नेता गडाङ्गी हा एक चांगला माणूस असल्याचे सांगितले. लिबियात कामकरी व मजूर म्हणून काम करणार्‍या काही भारतीयांनी सांगितले की, तेथील पोलिसांनी आम्हाला सुरक्षा तर दिली नाहीच पण आमच्या जवळचे मोबाईल, पैसे आदी वस्तू हिसकावून घेतल्या.
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील काही मजूर लिबियात काम करण्यासाठी गेले होते. आपली व्यथा सांगताना त्यातील काही मजुरांनी सांगितले की, एजन्टने त्यांना काम करण्याविषयीचा व्हिसा न देता दोन महिन्यांचा पर्यटन व्हिसा दिला. तिथे गेल्यावर त्यांच्याजवळ काम करण्याचा अधिकृत व्हिसा नसल्यामुळे त्यांना तिथे योग्य काम मिळाले नाही. ज्या कंपनीद्वारे ते काम करण्यासाठी गेले होते त्यांनी या मजुरांना खाण्याचे पदार्थ किंवा कोणतीही आरोग्य सुविधा पुरविली नाही. या मजुरांपैकी एका मजुराला हिंसाचाराच्या घटनेत डोक्याला मार लागला. परंतु, तरीही कंपनीने कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा पुरविली नाही.
असे अनेक चित्तथरारक व भयानक अनुभव घेऊन परतलेल्या लिबियातील भारतीयांना मायदेशी आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल सर्वांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
-----------------------------------------------------------------
५३० भारतीय परतले
लिबियातील हिंसक बंडाकडे बघता तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले असून काल एअर इंडियाची दोन विमाने कैरोकडे रवाना केली होती त्यापैकी एक विमान काल उशिरा रात्री दिल्लीला आले. यातून २९१ भारतात आले तर आज भल्या पहाटे आलेल्या दुसर्‍या विमानातून २३५ भारतीय परतले. अशाप्रकारे या दोन विमानांमधून एकूण ५२६ भारतीय मायदेशी परतले आहेत. लिबिया सरकारने भारताला १० मार्चपर्यंत दररोज दोन विमानांच्या उड्डाणांची परवानगी दिली आहे. ८८ भारतीयांनी ट्युनिशियात आश्रय घेतला आहे. लिबियात जवळपास १८ हजार भारतीय असावेत, असा अंदाज आहे.

No comments: