Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 March, 2011

कांदोळीत सुरक्षारक्षकाचा गळा चिरून खून

म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी)
वड्डे - कांदोळी येथील एका घराचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या आसाम येथील तोपेश्‍वर दास या युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, वड्डे - कांदोळी येथील एका दिल्लीस्थित इसमाच्या घरात तोपेश्‍वर दास गेल्या तीन महिन्यापासून सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सदर घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते व तोपेश्‍वर दास तिथे रखवाली करण्यासाठी एकटाच राहायचा. आज दि. २५ रोजी राम शर्मा हा सुतार काम करण्यासाठी आला असता त्याला पहिल्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तोपेश्‍वरचा मृतदेह दिसला. पोलिसांना माहिती मिळताच कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजूनाथ देसाई फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मयत बिछान्यावर पडला होता व त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. दि. २४ रोजी हा खून झाला असावा व तो अनैतिक संबंधांतून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांना त्याच्या डायरीत काही दूरध्वनी क्रमांक आढळून आले आहेत. खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जरी मिळालेले नसले तरी घरात महिलेचे चप्पल आढळून आल्या आहेत.पोलिस तपास सुरू आहे.

No comments: