Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 February, 2011

प्रगत राष्ट्र उभारणीसाठी डॉ.कलाम यांची त्रिसूत्री

-कोसंबी विचार महोत्सवाला उदंड प्रतिसाद
पणजी, दि. ६ (विशेष प्रतिनिधी): प्रतिभेतून येणारी सृजनशीलता, सृजनशीलतेमुळे होणारे बदल आणि बदलांतून साकारणार्‍या संशोधनातून प्रगत राष्ट्राची उभारणी सहज शक्य असल्याचा त्रसूत्री कानमंत्र माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल म यांनी आज येथे दिला. प्रगत राष्ट्राची उभारणी करताना आपल्याला भ्रष्टाचाराचा बिमोड करावा लागेल आणि ती जबाबदारी युवावर्गाला आपल्या खांद्यावर पेलावी लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
कला अकादमीत सुरू असलेल्या थोर विचारवंत डी.डी.कोसंबी विचार महोत्सवातील व्याख्यानमालेत भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणार्‍या डॉ.कलाम यांनी आज दुसरे पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे आगमन होताच युवावर्गाने त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. वैद्यकीय व अभियांत्रिकी शास्त्राची स्वतंत्रपणे प्रगती होऊन उपयोगाचे नाही. या दोन्ही शास्त्रांची सांगड घालून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडणार्‍या बदल व शोधांचा लाभ देशातील सामान्य जनतेला व्हायला हवा. कारण त्यावरच त्या देशाची प्रगती विसंबून असते, असे डॉ. कलाम म्हणाले. हे सांगताना त्यांनी किफायतशीर किमतीत उपलब्ध करण्यात आलेल्या 'केआर स्टेंट'च्या उत्पत्तीचे उदाहरण दिले. या स्टेंटचा उपयोग 'एंजिओप्लास्टीमध्ये' ह्ृदयरोग पिडीतांना होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण व नागरी विकास, दर्जेदार ऊर्जा व पाणी पुरवठा, कृषी व उद्योगांची सांगड, मूल्याधारीत शिक्षण, सर्वोत्कृष्ठ आरोग्य सेवा, भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासन, गरीबी व निरक्षरता निर्मूलन, अत्युच्च सुरक्षा व आतंकविरहीत प्रदेश ही भारताच्या 'मिशन २०२०' मधील पर्यावरणीयदृष्ट्या प्रगत राष्ट्रासाठीची महत्वाची क्षेत्रे असल्याचे डॉ. कलाम यांनी सांगितले. त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला फार मोठे काम करावे लागेल, असे डॉ. कलाम यांनी स्पष्ट केले.
भारताला प्रगतशील राष्ट्रांच्या पंक्तीत बसविताना कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, दर्जेदार वीज उत्पादन, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान यावरही आपल्याला भर देण्याची गरज आहे. त्या क्षेत्रांमध्येही आपल्याला मोठे बदल व संशोधन घडवून आणण्याची गरज असल्याचे मत डॉ. कलाम यांनी व्यक्त केले.
भारताच्या ढोबळ उत्पादनाचा दर दहा वर्षेपर्यंत दहा टक्के राहीला पाहीजे. गेल्या काही वर्षांत तो सात ते साडे सात टक्क्यांच्या घरात राहिला असून अलीकडे तो
वाढून आठ टक्क्यांवर आला आहे. तो तसाच तीन वर्षे कायम राहिला तर २०२० पर्यंत भारत प्रगत राष्ट्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
दिव्य दूरदृष्टीच देशाला पुढे नेत असते असे सांगून ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थाही या कामात फार मोठे योगदान देऊ शकतात. त्यांच्यात पथ मार्गदर्शक होण्याची क्षमता असल्याचेही डॉ.कलाम यांना ठासून सांगितले. आदर्श विश्‍वाच्या उत्पत्तीसाठी स्वतःच्या देशापासून सुरूवात व्हायला हवी. ज्या देशात अशांतता असेल तो देश आदर्श विश्‍वाच्या उत्पत्तीला बाधा आणेल. त्यामुळेच प्रत्येक देशात जेव्हा शांतता, सलोखा आणि भरभराट नांदेल तेव्हाच आदर्श विश्‍वाची उत्पत्ती साकार होईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
आदर्श विश्‍वाची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले की, जेथे प्रदूषण नाही, कुशल नेतृत्व आणि शांती आहे तेथेच ही संकल्पना साकार होणे शक्य आहे. प्रादेशिक विकासातूनच भारताचा विकास शक्य आहे. त्यासाठी भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र निर्माण करणे गरजेचे असून राष्ट्र हीच एक अशी जागा आहे जेथे युवावर्गाच्या उन्नतीसाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, असा सल्ला डॉ. कलाम यांनी दिला. मानवी मने अशक्य गोष्टही शक्य करतात. कारण, कल्पनाशक्तीे मनाला कार्यकुशल बनविते तर त्या कार्यकुशलतेतून शोध व बदलांचा जन्म होतो असे सांगताना त्यांनी आजच्या युवकांना कल्पक बनण्याचा सल्ला दिला. भ्रष्टाचार मुळासकट निपटून काढण्यासाठी काय करता येईल हे स्पष्ट करताना त्यांनी आजच्या युवकांना मतदान हे आपल्या हातातील शस्त्र असल्याचे सांगितले. त्याव्दारे कर्तृत्ववान व योग्य उमेदवार निवडून भ्रष्टाचार निर्मूलनाच्या सत्कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक युवक हा वेगळा असतो. सभोवतालचे वातावरण त्याचा वेगळेपणा काढून त्याला सर्वसामान्य बनविते. आपला वेगळेपणा जपण्यासाठी नेहमीच लढा द्या, असा संदेश देतानाच ही लढाई थांबवू नका असे आवाहन त्यांनी युवकांना केले. कल्पक बनण्यासाठी युवकांनी थोर शिक्षक, ग्रंथ व माणसांमध्ये कायम राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
झाडे हवेतील कार्बन शोषून घेतात. त्यामुळे हरीत क्रांतीसाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे तसेच आपल्या गावातील किमान पाच निरक्षरांना साक्षर करण्याचे काम आपण हाती घेतल्यास भारत २०२० सालापर्यंत प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत विराजमान होईल असा ठाम विश्‍वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
सुरूवातीस राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी डॉ. कलाम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी डॉ. कलाम यांना व्याख्यानाच्या शेवटी श्रीकृष्णाची मूर्ती व मानचिन्ह भेट म्हणून दिली. उपस्थितांमध्ये माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, माजी मंत्री रमाकांत खलप, पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, उद्योगपती श्रीनिवास धेंपे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर तिंबले यांनी केले.
----------------------------------------------------
कलाम उवाच...!
- जर आपली एक इच्छा पूणर्र् करण्याची संधी देवाने मला दिली तर त्याच्याकडे 'मी काय करू शकतो याचा सदैव विचार करण्याची शक्ती मला दे' अशी विनंती करेन.
- युवकांमध्ये देशभक्ती आहेच. ती वाढविण्याची गरज नाही तर ती चेतविण्याची गरज आहे.
- आपल्या ह्ृदयात श्रीमंती असेल तर तेथे चारित्र्याचे सौंदर्य वास करेल. जेथे चारित्र्याचे सौंदर्य आहे तेथे एकोपा नांदेल, जेथे ऐक्य आहे तेथे शिस्त येईल आणि शिस्त आली तर तेथे शांतता राहील.
- माता पिता व प्राथमिक शिक्षक हे मनाच्या श्रीमंतीचे प्रेरणास्त्रोत आहेत.

No comments: