Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 February, 2011

गोव्याच्या १३० टन भाजीची बेळगावात व्यापार्‍यांकडून नासधूस

• भाजीतही आता माफियांचे राज्य?
• विक्री केंद्रावर आज भाजी नाही

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): भाजीवरून सुरू झालेल्या वादाला आज हिंसक वळण लागले असून गोवा फलोत्पादन मंडळाने विकत घेतलेल्या सुमारे ३५ लाख रुपयांच्या १३० टन भाजीची आज बेळगावातील घाऊक विक्रेत्यांनी नासधूस केली. त्यामुळे उद्या गोव्यातील स्वस्त भाजी विक्री केंद्रांवर भाजी उपलब्ध होणार नसल्याचे फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सांगितले. या प्रकाराला गोव्यातील परप्रांतीय घाऊक भाजी व फळ विक्रेत्यांचीही फूस असल्याचा दावा श्री. आमोणकर यांनी यावेळी केला. ते आज सायंकाळी महामंडळाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या सकाळी कृषी खात्याचे सचिव, खात्याचे संचालक आणि फलोउत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बेळगाव येथे जाऊन याची रीतसर पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बेळगाव पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. तर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हे येथील जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव येथील घाऊक विक्रेते आणि गोव्यातील काही विक्रेत्यांनी ‘लॉबिंग’ केले असून अवाढव्य पैसे आकारून गोमंतकीयांना महाग भाजीची विक्री करतात. सरकारच्या या योजनेमुळे भाजी किती स्वस्त विकली जाऊ शकते, हे उघड झाल्याने या लॉबीने फलोउत्पादन मंडळाला भाजी पुरवणार्‍या व्यावसायिकांवर हल्ला चढवून त्यांना मारहाणही केली असल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
सरकारच्या योजनेनुसार कोबी हा ४.५० रुपयेकिलो दराने केंद्रावर विकला जातो. तर, बाजारात हाच कोबी २२ ते २५ रुपयांनी विकला जातो. हे ‘भाजी माफिया’ आपली मनमानी करून गोव्यातील जनतेकडून अधिक पैसे आकारतात. या विक्रेत्यांवर सरकारचा कोणताही अंकुश नाही. त्यामुळे सरकारने या विक्रेत्यांवर वचक ठेवण्याची गरज असल्याची मागणी श्री. आमोणकर यांनी यावेळी केली. गोव्यातील बाजारपेठेत केवळ ५ टक्के भाजी विक्रेते हे गोमंतकीय आहेत तर, अन्य ९५ टक्के भाजी विक्रेते हे परप्रांतीय आहेत. या ९५ टक्के परप्रांतीयांनी सरकारच्या योजनेत लुडबुड करू नये, असा इशाराही श्री. आमोणकर यांनी यावेळी दिला.
गोव्याला दर दिवशी ३५० टन भाजी लागते. यातील ४० टक्के भाजी ही फलोत्पादन केंद्रातून विक्री केली जाते. तर, ६० टक्के भाजी अन्य बाजारातून लोकांपर्यंत पोहोचते.
गोव्यात येणारी भाजी चिकमंगळुर, बेळगाव तसेच अन्य भागातून घेऊन बेळगावात पाहिजे त्या वजनाप्रमाणे बांधली जाते. आज सायंकाळी हे काम करत असलेल्या कामगारांवर ३०० जणांच्या जमावाने याठिकाणी हल्ला चढवत त्यांना मारहाण केली. भाजी घेऊन येण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली व गोव्यासाठी भाजी उपलब्ध करणार्‍या व्यापार्‍यांनाही मारण्याची धमकी दिली. तेथील पोलिसांच्या देखत हे सर्व घडल्याची माहिती श्री. आमोणकर यांनी यावेळी दिली.

No comments: