Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 February, 2011

गावाकडची ‘श्रीमंती’ रेखाटणारा कलाकार

पणजी, दि. ८ (सांस्कृतिक प्रतिनिधी): ‘हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही,’ असे सांगितले जाते ते मी याचि देही याचि डोळा अनुभवले आहे. माझ्या जीवनात असाच एक प्रसंग घडला. लहान असताना अपघात झाला आणि हाताचे हाड मोडले. त्यामुळे खूप दिवस इस्पितळात राहावे लागले. तिथे विरंगुळा म्हणून वडिलांनी कागद आणि पेन्सिल आणून दिली. मग इस्पितळात उपचार घेणे आणि चित्र काढणे हा माझा नित्यक्रम बनला. मी रेखाटलेली ती चित्रे श्री. भोसले आणि श्री. माने या माझ्या गुरूजींनी बघितली आणि त्यांनी मला याच कलेत जीवन घडवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आशीर्वादानेच मी चित्रकार बनलो. तेथेच माझ्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. मग कला हेच माझे जीवन बनले... विख्यात चित्रकार गोपाळ परदेशी यांनी अशा प्रकारे आपला जीवनपटच समोर मांडला.
सध्या कला अकादमीच्या आर्ट गॅलरीत श्री. परदेशी यांचे ‘आंगन’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. पुणे घोरपडी हे परदेशी यांचे जन्मस्थान. हा माणूस अतिशय दिलदार आणि मनमोकळा.
यावेळी पुढे त्यांनी सांगितले की, बालपणापासूनच चित्रकलेची मला आवड. नंतर दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या अभिनव आर्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या अगोदर चित्रकलेतील एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला होता. साहजिकच माझा महाविद्यालयातील प्रवेश सोपा झाला.
आता काळ झपाट्याने बदलत आहे गावांचे शहरीकरण होऊ लागल्याने गावपणाची श्रीमंती लोप पावत चालली आहे. पुढील पिढीला गाव ही संकल्पना चित्रातूनच समजावून द्यावी लागेल. त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. कुठलेही चित्र रंगवण्यापूर्वी त्या गावचा अभ्यास करणे, तिथले लोक आणि त्यांचे राहणीमान यांचे सखोल निरीक्षण करणे व त्याला कलेची जोड देऊन कलाकृती साकार करणे हे आपल्या कलेचे तत्त्वज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले.
मी अशी सुमारे ४०० चित्रे आत्तापर्यंत रंगवली आहेत. चित्रकलेचे क्षेत्र म्हणजे एक जुगारच आहे. कारण रसिकांची पसंती आणि आर्थिक बाजू भक्कम असणे या गोष्टी तुम्हाला लाभल्या तर यश हमखास मिळते. घरच्या मंडळींनी त्याबाबत चांगली मदत केल्याने इथपर्यंत मजल मारू शकलो. आत्तापर्यंत आपण पोर्टे्रेट, लँडस्केप अशी विविध चित्रे रंगवली. कलेतील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी काही नवीन करण्याची मनोकामना असून त्यासाठी प्रयत्नरत आहोत.
गोव्यात याअगोदर आपण दोनदा प्रदर्शन भरविले होते. मुंबईतही आपल्या चित्रप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यात आपल्या चित्रांचे प्रदर्शन तिसर्‍यांदा भरले आहे. मुंबईतील रसिकांच्या तुलनेत गोमंतकातील रसिक
रसिक दर्दी असल्याचे मला तीव्रतेने जाणवले. चांगल्या गोष्टीला तो मनसोक्त दाद देतो. तसेच त्रुटी व चुकांची जाणीवही करून देण्यास हा रसिक मागेपुढे पाहात नाही. लवकरच आपण दिल्लीत चित्रप्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: