Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 February, 2011

‘गोवा लुटणार्‍या कॉंग्रेसला जनता निश्‍चित सत्ताभ्रष्ट करेल’

भाजप कार्यकारिणीची बैठक
डिचोली, दि. ६ (प्रतिनिधी): ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांचे भ्रष्टाचार रोज उघडकीस येत आहेत, त्याच धर्तीवर गोव्यातील दिगंबर कामत सरकारातील बहुतेक मंत्री वेगवेगळ्या पद्धतीने गोवा लुटण्याच्या कार्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे या राज्य शासनाची प्रतिमा जनमानसात डागाळलेली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याचा संकल्प जनतेने केला आहे. पुन्हा भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आगामी आठ महिन्यांत कार्यकर्त्यांनी तळमळीने जनतेशी संपर्क साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी डिचोली येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
डिचोली येथील हिराबाई सभागृहात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार राजेश पाटणेकर, अनंत शेट व इतर सर्व भाजपचे आमदार, महिला अध्यक्ष कुंदा चोडणकर तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चाचे प्रतिनिधी व राज्यातील सर्व मतदारसंघातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा भाजपला सत्तेवर आणण्यासाठी व्यूहरचना संघटनात्मक कार्य, मतदारसंघनिहाय प्रचाराची रणनीती, धोरणात्मक निर्णय आदी अनेक विषयांवर विचारपंथन करण्यासाठी आयोजित या बैठकीत भाजपाने राज्यभरातील सुमारे २०० पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी
सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य शासनाने गोव्याची मान शरमेने खाली घालायला लावली असून, पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोवा ‘नंबर वन’ असलेली प्रतिमा आज दिगंबर कामत सरकारने मलीन केलेली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचा पुत्रच अमली पदार्थाच्या व्यवहारात सहभागी असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात तर भ्रष्टाचाराचा कहर माजलेला आहे. आरोग्य खात्यातील मंत्र्याने भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला आहे. या सर्व स्थितीत आज मंत्र्यांनी गोवा विक्रीला काढलेला आहे. त्यामुळे तळागाळातील जनतेत या शासनाच्याबाबतीत प्रचंड चीड आहे. त्याचा उद्रेक आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजपचे कार्य घरोघरी पोचवण्याची गरज असल्याचे पार्सेकर म्हणाले.
सुमारे १०० ते १५० बेकायदा खाणी राज्यात चालू आहेत. हिरवी सृष्टी रक्तरंजित करण्याचा डाव कामत सरकारने आखला आहे. निसर्ग, नदी, नाला, जंगल, पर्यावरणाचा र्‍हास चालू आहे. भ्रष्टाचाराने परिसीमा गाठलेली असताना आता हा हिरवा निसर्ग भावी पिढीसाठी शाबूत ठेवायचा असेल तर विद्यमान सरकारला खाली खेचणे हाच एकमेव पर्याय असल्याने त्यांनी सांगितले.
गोव्याच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अनेक घोटाळे उघडकीस आलेले आहे. सर्व मंत्री व मुख्यमंत्री गोवा विकायला निघालेत. पर्यटनाच्या नावाखाली अमली पदार्थाचे प्रमुख केंद्र गोवा बनलेले आहे. पोलिस यंत्रणा गैरव्यवहारात प्रत्यक्ष सहभागी आहे. या सर्व गोष्टी गोव्याला सुवर्णमहोत्सवी वर्षात विध्वंसाकडे नेणार्‍या असून याच्या विरोधात जनआंदोलन छेडण्याची आवश्यकता असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
स्वागतपर भाषणात आमदार राजेश पाटणेकर यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात भाजपची आगामी रणनिती व धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. राज्यात शासन नावाची चीज अस्तित्वात नाही. सर्व सावळागोंधळ असून भाजपने अधिक जागृतपणे कार्य करून राज्यात पुन्हा भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आजची बैठक महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
बैठकीत दिवगंत नेते, अभिनेते, आमदार आदींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

No comments: