Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 February, 2011

खारीवाडातील घरांवरील कारवाई तूर्तास टळली

• प्रशासकीय लवादाकडून स्थगिती
• आजच्या सुनावणीनंतर पुढील कारवाई


वास्को, दि.७ (प्रतिनिधी)
मुरगाव नगरपालिकेने आज (दि. ७) खारीवाडा येथील ३३० घरांवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे येथील हजारो लोकांनी सुटकेचा श्‍वास सोडला. खारीवाडा येथील सदर घरांपैकी सुमारे ७० जणांनी प्रशासकीय लवादाकडून स्थगिती आणल्याची माहिती मुरगावचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर यांनी दिली. याप्रकरणी उद्या सुनावणी झाल्यानंतरच पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुरगाव बंदराच्या विस्तारासाठी व इतर काही कारणासाठी खारीवाडातील ३३० घरांवर कारवाई करून १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश मुरगाव नगरपालिकेला देण्यात आला होता. त्या आदेशान्वये मुरगाव पालिका आज सदर घरे जमीनदोस्त करणार होती.
सदर बांधकामांचे बहुतेक मालक प्रशासकीय लवादाकडून स्थगिती मिळवण्याच्या धावपळीत असल्याचे दिसले. मुख्याधिकारी श्री. पार्सेकर यांच्याशी याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी नुकतीच सुमारे ७० बांधकामांच्या मालकांनी प्रशासकीय लवादाकडून स्थगिती मिळवल्याची माहिती दिली. ही बांधकामे कुठली आहेत ते ओळखण्यासाठी आजची कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर ७० घरांच्या मालकांची उद्या प्रशासकीय लवादासमोर सुनावणी असल्याचे श्री. पार्सेकर यांनी सांगितले. या घरांबाबत सुनावणीनंतरच पुढे काय करायचे ते कळेल असे त्यांनी म्हटले. पालिका सूत्रांच्या माहितीनुसार सदर घरांवर कारवाई करण्यासाठी दक्षिण गोवा बेकायदा बांधकाम कारवाई पथकाला आज बोलवण्यात आले होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे ज्यांना स्थगिती मिळालेली नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
मात्र श्री. पार्सेकर यांनी याबाबत १५ रोजी कसा अहवाल देणार या प्रश्‍नावर मौन पाळणेच पसंत केले.
गोवा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांना संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रशासकीय लवादाकडून अद्यापपर्यंत १२० बांधकामांना स्थगिती आणण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी अन्य ३० बांधकामांना स्थगिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित बांधकामांना स्थगिती आणण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. १९९८ सालात मुरगाव बंदराने सहीकेलेल्या सामंजस्य कराराच्या अटी मान्य केल्या असत्या तर याचा सर्वांनाच फायदा झाला असता असे श्री. परेरा यावेळी म्हणाले.

No comments: