Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 10 February, 2011

सावर्डे-तिळामळ चौपदरीकरण रद्द खनिज वाहतुकीसाठी बगलरस्ता

-खाणग्रस्त आंदोलकांनी मडगाव दणाणून सोडले
-संतप्त निदर्शकांसमोर सरकारची सपशेल माघार

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): सांगे, कुडचडे, सावर्डे येथील खाणवाहतुकीमुळे होणारे धूळप्रदूषण, अपघाती मृत्यू व तासन्तास वाहतुकीचा खोळंबा आणि या सर्वच बाबींकडे सरकारकडून होणारे दुर्लक्ष याचा निषेध करून कुडचडे-तिळामळ रस्ता चौपदरीकरण बंद करावे तसेच बगलरस्ता हाती घ्यावा या आपल्या मागणीच्या पुष्ट्यर्थ त्या भागातील संतप्त रहिवाशांनी आज मडगावी धडक दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासासमोर व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्ता रोखून आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडविले. त्यामुळे ताळ्यावर आलेल्या सरकारने गेली चार वर्षे भिजत ठेवलेली बगलरस्त्याची मागणी तात्काळ मान्य केली आणि रस्ता चौपदरीकरणाचे काम रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चार तास धरलेले हे धरणे आंदोलकांनी मागे घेतले.
सकाळी ८ वाजताच मालभाटात दाखल झालेल्या आंदोलकांत महिलांचा भरणा अधिक होता. संपूर्ण दक्षिण गोव्यातून मडगावात आणलेल्या पोलिसांनी मुख्यमंत्री निवासाभोेवती कडे केले होते. पोलिस अधिकार्‍यांनी निदर्शकांना निवासालगत प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. नंतर पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांच्या विनंतीवरून आंदोलकांनी पाजीफोंडकडे जाणारा रस्ता मोकळा ठेवला. त्यांनी साडेअकरापर्यंत हे आंदोलन चालू ठेवले.
तब्बल चार तास रस्ते अडवून धरणे धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पणजीहून बगल रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे व चार पदरी रस्त्याचे काम तूर्त स्थगित ठेवत असल्याचे आश्‍वासन जल्हाधिकारी जी. पी. नाईक यांच्यामार्फत दिले.त्याचबरोबर पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांच्या अकार्यक्षमतेमुळे ट्रकांची जीवघेणी शर्यत सुरू असल्याचा आरोप करून त्यंाची बदली करण्याची जी मागणी केली त्यावर विचार करण्याचे आश्‍वासनही दिले.
सकाळी सदर मोर्चा पोलिसांनी चार रस्त्यांच्या संगमावरच रोखला. त्यानंतर मोर्चेकर्‍यांनी तेथेच ठाण मांडले. मुख्यमंत्री पणजीत असल्याने पोलिसांनी त्यांना पणजीत जाऊन त्यांच्याशी बोलणी करण्याची केलेली विनंती आंदोलकांनी प्रथम अव्हेरली. मुख्यमंत्र्यांनीच येथे यावे असा हेका धरला; पण श्री. फर्नांडिस यांनी त्यांची समजूत घातली व नंतर एक शिष्टमंडळ पणजीकडे रवाना झाले. मोर्चेकर्‍यांनी मग रस्त्यावर बसकण मारली. दुपारी २ वा. जिल्हाधिकार्‍यांकडे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मोर्चा विसर्जित केला. मध्यंतरी बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मोर्चेकर्‍यांना सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बगलरस्ता तात्काळ करण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी दिले; पण त्यावर मोर्चेकर्‍यांनी भरवसा ठेवण्यास नकार दिला.
मडगावहून पणजीत गेलेल्या शिष्टमंडळाने आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी नंतर जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनेही काहीच निष्पन्न न झाल्याने शिष्टमंडळ परतले व दुपारी १२ वाजता मालभाट येथून मोर्चा जिल्हाधिकार्‍यांच्या कचेरीवर नेण्यात आला. हातात फलक व सरकारचा निषेध करणार्‍या घोषणांनी सर्व शहर दुमदुमले. जिल्हाधिकारी इमारतीसमोर मोर्चेकर्‍यांनी ठाण मांडल्याने पुन्हा संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी झाली. मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून हटणार नाही असा निर्धार मोर्र्चेेकर्‍यांनी केला. दोन तास वाहतूक अडली तर तुम्हाला किती त्रास होतो पण सावर्डे कुडचडे भागांत आम्ही कित्येक वर्षांपासून हा विदारक अनुभव घेत आहोत याची कोणतीच पर्वा या सरकारला नसल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
बर्‍याच वेळानंतर जिल्हाधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास बोलावले; पण ही सूचना मोर्चेकर्‍यांनी झिडकारली. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांनाच खाली बोलावले. पोलिस अधीक्षक श्री. फर्नांडिस यांनी मोर्चेकरी व जिल्हाधिकार्‍यांदरम्यान मध्यस्थाचे काम केलेे. त्यांचे सांगणे जिल्हाधिकार्‍यांपर्यंत व जिल्हाधिकार्‍यांचे सांगणे मोर्चेकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात ते मग्न होते. अखेरमंत्री चर्चिल व महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यासमवेत जिल्हाधिकारी खाली आले व त्यांनी लोकांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
चर्चिल यांनी, बायपास रस्ता तात्काळ करण्याचे व चार पदरी रस्ता स्थगित ठेवण्याचे आश्‍वासन त्यांना दिले तर जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बोलण्यांची सर्व माहिती त्यांना दिली तेव्हा सर्व आश्‍वासने लेखी द्या, असा आग्रह लोकांनी धरला. तो मान्य करणे जिल्हाधिकार्‍यांना भाग पडले. ट्रकांवर निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. फर्नांडिस यांना कुडचड्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे ते उद्या (गुरुवारी) कुडचडे येथे जाऊन पाहणी करणार आहेत.
त्यानंतर मोर्चातील शीतलकुमार काकोडकर, संजय देसाई, बाबाजीन फर्नांडिस, ओलिंदा लोपेस, अत्रेय काकोडकर, परेश भेंडे, राजेंद्र काकोडकर, प्रदीप काकोडकर व मार्टिन फर्नांडिस यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ समितीच्या बैठकीत जे निर्णय झाले त्याची माहिती दिली. नेतुर्ले ते कापशे, कापशे ते गुड्डेमळ, कुडचडे बायपास व केपे बायपास अशा चार विभागांत हा रस्ता करण्यात येणार असून नेतुर्ले ते कापशे, गुड्डेमळ या रस्त्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केप्याच्या बायपासचे काम सुरू होणार आहे. कुडचडे येथील बायपास मार्गाची आखणी केलेली आहे. पाणी कालव्याच्या समांतर असा हा रस्ता जात असून त्याची पाहणी करून बांधकाम खात्याच्या २५ विभागाला तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्यास गोव्याच्या मुख्य सचिवांनी आदेश दिला आहे. त्यांनी ८ महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत चार महिन्यांवर आणली असून मुख्य सचिवांनी तसे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सांगितले.
खनिज माल वाहतुकीला आमचा विरोध नसून त्यावर निर्बंध घालावे अशी मागणी आंदोलकांनी केली. चौपदरी रस्ता स्थगित झाल्याचे तसेच बायपास रस्ता तात्काळ सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन संध्याकाळपर्यंत देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. पोलिस अधिकार्‍याच्या बदलीची व जादा पोलिस कुमक पाठविण्याची मागणी आपण सरकारला तात्काळ पाठवतो तसेच पोलिस अधीक्षक त्याची नोंद घेतील, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. एका आठवड्यात कुडचडेच्या या नेत्याबरोबर बैठक घेऊन त्यावर तात्काळ उपाय योजना काढण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर सदर नेत्यांनी मोर्चात सामील झालेल्या लोकांना ती माहिती दिली व आज मोर्चा विसर्जन करण्याचे आवाहन केले. मात्र या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा संपणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.

No comments: