Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

चर्चिल यांच्या मुक्ताफळांमुळे कारवारात संतापाची लाट..!

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): कर्नाटकातील कारवार भाग कोकणीभाषक असून विकासापासून वंचित राहिल्याने तेथील लोकांचा पाठिंबा मिळाल्यास कारवारचा भाग गोव्याला जोडण्यासाठी कायदेशीर लढा उभारू, या चर्चिल आलेमाव यांच्या वक्तव्यामुळे कारवार भागात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी माधव नाईक यांनी कारवार सदाशिवगड पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवून चर्चिल यांनी स्फोटक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अलीकडेच कारवार भागातील कोकणीभाषक मंडळींनी सदाशिवगड येथे खास मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना आमंत्रित केले होते. या मेळाव्यात भाषण करताना चर्चिल यांनी कारवार गोव्यात सामील करण्यासंबंधी या मंडळींच्या लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला होता. कारवारात बहुसंख्य लोक कोकणीभाषक आहेत. त्यामुळे कर्नाटकापेक्षा या लोकांचा ओढा गोव्याकडे आहे. या लोकांनी पाठिंबा दिल्यास त्यासाठी आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ही मागणी पदरात पाडून घेण्यास तयार आहोत,असेही चर्चिल म्हणाले होते.
मात्र चर्चिल यांच्या या वक्तव्यामुळे कन्नडभाषकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. कर्नाटकाच्या कारभारात चर्चिल यांनी नाक खुपसण्याचे काहीही कारण नसून त्यांनी स्वतःच्या राज्याकडेच लक्ष द्यावे,असा सल्ला या मंडळींनी दिला आहे. यासंबंधी पोलिस तक्रार दाखल झाल्याने चर्चिल यांच्यासाठी हे भाषण अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ज्या लोकांना गोवा जवळचा वाटतो त्यांनी तेथे स्थलांतर करून वास्तव करावे; पण कारवार भाग गोव्याला जोडण्याची स्वप्ने पाहू नये,असा सज्जड इशारा तेथील काही समाज संघटनांनी दिला आहे. कारवारात बहुभाषिक लोक वास्तव्य करतात. तेथे ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गोव्यातील राजकारण्यांनी येथे येऊन या लोकांत फूट पाडण्याचे प्रयत्न करू नयेत; अन्यथा त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कारवारवासीयांनी दिला आहे.

No comments: