Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

४४० जीवरक्षक सेवेत बिनशर्त रुजू

दमदार नेतृत्वाअभावी आंदोलन बारगळले
पणजी,द. ११ (प्रतिनिधी): जीवरक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनातील असंघटीतपणाचा लाभ उठवत 'दृष्टी स्पेशल सर्व्हिस प्रा. ली' या कंपनीने अखेर हे आंदोलन मोडीत काढण्यात यश मिळवले आहे. जीवरक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले असून उद्या १२ रोजी सर्व कामगार बिनशर्त सेवेत रुजू होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी व्ही. कन्वर यांनी दिली.
राज्यातील किनारी भागांत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन खात्यातर्फे 'दृष्टी' या कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीतर्फे विविध किनारपट्टीवर जीवरक्षकांची भरती केली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या एका अधिकार्‍याकडून एका कामगाराला मारहाण करण्यात आल्याने बहुतांश कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यानिमित्ताने कंपनीकडून या कामगारांची पिळवणूक होत आहे व त्यांना मिळणारा पगारही अल्प असल्याची तक्रार या कामगारांनी केली होती.
या कामगारांनी सरकारकडे मध्यस्थी करण्याची केलेली मागणी राज्य सरकारतर्फे धुडकावून लावण्यात आल्याने हे कामगार एकाकी पडले होते. आंदोलनासाठी कामगारांकडे दमदार नेतृत्व नसल्याने कंपनीने हे आंदोलन मोडीत काढले आहे. नव्यानेच भरती केलेल्या कामगारांना सेवेतून निलंबित केल्यानंतर व नव्याने जीवरक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या आंदोलनात फूट पडली. टप्प्याटप्पाने उर्वरित कामगारही सेवेत रुजू होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अखेर या कामगारांनी माघार घेणे पसंत केले. सेवेतून काढून टाकलेल्या ५४ जीवरक्षकांना परत भरती करून घेणार नाही, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.
सध्या ४४० जीवरक्षक कंपनीकडे असून अतिरिक्त जीवरक्षकांची भरती लवकरच केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण सहकार्य केल्याचा दावा कंपनीने केला आहे. या काळात कंपनीतर्फे मुंबईहूनही काही कामगारांना गोव्यात पाचारण करून त्यांना किनारपट्टीवर रुजू केल्याची माहिती मिळाली आहे. कामावर रुजू झालेल्या कामगारांच्या सुरक्षेसंबंधी पोलिसांना विनंती करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

No comments: