Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 December, 2010

गोवा लक्झरीबस-तावेरा टकरीत रत्नागिरीचे दहा ठार

एकाच कुटुंबातील नऊ जणांचा अंत
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या एका आरामदायी प्रवासी बसगाडीची तावेरा गाडीला आज पहाटे चारच्या सुमारास खेडनजीक ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांसह दहा जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी चिपळूणला चालले होते. जखमीला खेडच्या सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले असून तो अपघातग्रस्त बसचा चालक आहे.
रत्नागिरी पोलिस सूत्रांनी दै.गोवादूतला दूरध्वनीवर दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्यांमध्ये तावेराच्या चालकाचाही समावेश असून इतर नऊ जण हे एकाच कुटुंबातील आहेत, तर गंभीर जखमी अवस्थेतील बसचा चालक कुस्तान नमिल फर्नांडीस हा कोरगाव पेडणे येथील आहे.
पहाटे चारच्या सुमारास हा अपघात रत्नागिरीपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या उधळे गावाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडला. अपघातग्रस्त तावेरा गाडी (क्रमांक एम एच ०३ ए एम ६२७३) रत्नागिरीकडे येत होती तर जी ए ०१ ए ई ९९७८ क्रमांकाची पावलो ट्रॅव्हल्सची बस गोव्याहून मुंबईकडे जात होती.
प्रदीप मारूती खेतले (२८), अनंत गणपत खेतले (५५), प्रेमा अनंत खेतले(४८), विष्णू गणपत खेतले (४६), तारामती महादेव खेतले(५८), महादेव चंद्रकांत खेतले(७०), विनया विष्णू खेतले(४०), अंजना गणपत खेतले(८०), सुगंधा सुरेश मोरे(४०) व तावेराचा चालक सूरज शंकर जाधव (३१) यांचा ठार झालेल्यांमध्ये समावेश आहे.यापैकी काही जण भारत पेट्रोलियम कंपनीचे कर्मचारी होते.
कशेडी घाटात एका तीव्र वळणावर हा अपघात झाला. अपघात घडल्यावेळी दोन्ही वाहनांतील प्रवासी साखरझोपेत होते. अपघाताचे निश्‍चित कारण समजू शकले नसले तरी चालकाला पहाटेच्या साखरझोपेवेळी डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा असा कयास आहे. मयत खेतले कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुटगिरी गावचे आहे.

No comments: