Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 December, 2010

पेट्रोलचे दर कडाडले

• लीटरमागे ३ रुपयांनीे वाढ • डिझेलची दरवाढ २२ पासून?
नवी दिल्ली, दि. १४: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या देशातील प्रमुख इंधन कंपनीने पेट्रोलच्या दरात लीटरमागे २.९५ रुपये वाढ जाहीर केली आहे. नवे दर आज(दि.१४)मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.डिझेलच्या दरात सध्या वाढ करण्यात आलेली नसली, तरी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक २२ डिसेंबरला होत असल्याने, त्यावेळी डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता आहे. कांद्यापासून खाद्यतेलापर्यंतच्या महागाईने भारतीयांच्या डोळ्यांत आसवे आणली असतानाच, डिसेंबरच्या मध्यास होणारी दरवाढ सामान्य वाहनचालकाचे कंबरडेच मोडणारी ठरणार आहे. इंधनावरील सरकारी निर्बंध काढून टाकण्यात आल्यापासून दरवाढीची ही सहावी खेप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांही गुरुवारपासून ही दरवाढ लागू करणार आहेत. दि. ९ नोव्हेंबर रोजी इंधन कंपन्यांनी ३२ पैसे वाढ केली होती.
गेल्या जूनमध्ये केंद्र सरकारने इंधन कंपन्यांवरील नियंत्रण उठविले होते. त्यावेळेपासून आत्तापर्यंत या कंपन्यांनी सहा वेळा दरात बदल केले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरेल ७५ डॉलर्सवरून ९० डॉलर्स वाढल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. सरकारने आपली जबाबदारी झटकल्याने इंधन कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलीटर ४.१७ रु. एवढी हानी सोसावी लागते, डिझेलवर पाच रुपयांचा फटका बसतो. संसदेचे अधिवेशन काल संपल्यानंतर लगेचच पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. इंधन कंपन्यांच्या मतानुसार, प्रत्येक स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमागे २७२ रुपये नुकसान सोसावे लागते, तर केरोसीनमागे १७.७२ रुपयांचा फटका बसतो.
बॉक्स करणे
ही कॉंग्रेसची देणगी : प्रा. पार्सेकर
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आम आदमीचे नाव घेऊन प्रत्यक्षात या घटकालाच भीकेला लावण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर देशातही त्या कमी व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात तसे कधीच झाले नाही. आता नवी दरवाढ देशवासीयांच्या माथी मारून संपुआ सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचाच संकल्प केल्याचे चित्र दिसून येते. कारण इंधनाच्या किंमती वाढल्या की, ते सार्वत्रिक महागाईला आयतेच निमंत्रण ठरते. त्यामुळे गोव्यासह आगामी विधानसभा निवडणुकांत जेव्हा जेव्हा लोकांना मतदानाची संधी मिळेल तेव्हा लोकांनी कॉंग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहनवजा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली.
विनाशकाले विपरित बुद्धीः फोन्सेका
केंद्र सरकारची बुद्धी कशी भ्रष्ट झाली आहे त्याचे हे मासलेवाईक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केली. कष्टकरी वर्गाला भिकेला लावण्याचा डाव यातून उघड झाला आहे. हे सरकार फक्त धनवंतांचचे चोचले पुरवण्यात मग्न आहे. घोटाळे हेच संपुआ सरकारचे मुख्य वैशिष्ट्य बनले आहे. आता नव्याने पेट्रोलचे दर वाढवल्यामुळे सर्वच पदार्थांची दरवाढ अटळ आहे. म्हणून सामान्य जनतेने लोकलढा उभारणे हाच यावरील मार्ग असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
या पेट्रोल दरवाढीबद्दल जनसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सध्या महागाईने कळस गाठला आहे. दोन प्रहर कसे भागवावेत याची चिंता कष्टकरी वर्गाला लागलेली असताना पुन्हा तब्बल तीन रुपये पेट्रोलची दरवाढ करून या सरकारने हद्द गाठली आहे. कॉंग्रेसला निवडून दिले ती आपली मोठीच चूक झाली याबद्दल आता लोकांची खात्रीच पटली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कॉंग्रेसच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

No comments: