संसद ठप्प झाल्याने जनतेच्या १५४ कोटी रुपयांचा चुराडा
नवी दिल्ली, दि. १३ : ‘टूजी स्पेक्ट्रम’ वाटप घोटाळा तसेच भ्रष्टाचाराच्या इतर मुद्यांवर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात यावी, या विरोधकांच्या मागणीवरून गेल्या २३ दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले होते. भारतीय संसदेच्या इतिहासात आतापर्यंत इतके दिवस संसदेचे कामकाज न झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉंग्रेसने काहीही झाले तरी जेपीसी स्थापन करणार नाहीच, अशी भूमिका घेतली. त्याला विरोधकांनी तसेच प्रखर उत्तर दिले. त्यांनी जेपीसीची मागणी लावून धरली.
आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी ‘जेपीसी’च्या मागणीवरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज १२ वाजेपर्यंत व नंतर या स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतरही सभागृहातील स्थितीत कोणताही फरक न पडल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करत संसद अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली. कोणतेही कामकाज न झाल्यामुळे जनतेच्या खिशातून कररुपाने जमा झालेल्या सुमारे १५४ कोटी रुपयांचा अक्षरशः चुराडा झाला.
९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुसर्या दिवसापासूनच विरोधकांच्या गोंधळामुळे दररोज स्थगित होत असे. आज संसदेच्या अखेरच्या दिवसापपर्यंत हा गोंधळ जारी राहिल्याने कामकाज ठप्प होते. या हिवाळी अधिवेशनाच्या २३ दिवसांच्या काळात केवळ तीन तासच संसदेचे कामकाज झाले व तेही विरोधकांच्या गोंधळात. लोकसभेत एक दिवस प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला तर राज्यसभेत मात्र एक दिवसही कामकाज होऊ शकले नाही. एवढेच नाही तर दर शुक्रवारी होणारे गैरसरकारी कामकाजही होऊ शकले नाही.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल म्हणाले, भारतीय संसदेच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गतिरोध होता. २ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील घोटाळा व मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीत झालेला घोटाळा यांची संयुक्त संसदीय समितीमाफत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेतृत्वाखालील रालोआ, राजद, डावे पक्ष, अद्रमुक, सपा सदस्य करीत आहेत.
Tuesday 14 December, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment