Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 November, 2010

पावसामुळे त्रेधातिरपीट

व्यापाऱ्यांचे नुकसान, वीज गायब
पणजी, दि.३ (प्रतिनिधी)- आज (दि.३) अचानक आलेल्या पावसाने राजधानी पणजीला चांगलेच झोडपले. गडगडाटासह कोसळलेल्या जोरदार सरींमुळे पणजी जलमय झालीच पण त्याचबरोबर सुमारे अर्धा तास वीजही गायब झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. याशिवाय राज्यातील बहुतेक भागात पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली; मात्र, सर्वाधिक पावसाची नोंद होत असलेला सत्तरी तालुका संध्याकाळपर्यंत कोरडा होता.
गेल्या चार पाच दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाळी वातावरण तयार झाले व दीड दोनच्या सुमारास गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे कार्यालयातून व आस्थापनांतून दुपारी जेवायला घरी व खानावळीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बरेच हाल झाले. शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने या पावसाच्या तडाख्यातून विद्यार्थिवर्ग बचावला. अनेक कर्मचारी न जेवताच कार्यालयात बसून राहिल्याची माहिती मिळाली. या पावसामुळे पणजीत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले व पादचाऱ्यांना पावसाच्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. अनेक दुचाकीस्वारांनी रेनकोट आणले नव्हते; त्यांना भिजावे लागले. या पावसाचा सर्वांत जास्त फटका बाजारातील व्यापाऱ्यांना बसला. दिवाळीसाठी आणलेल्या व बाहेर मांडलेल्या बऱ्याच किमती वस्तू भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तसेच सुमारे दोन तास पाऊस पडल्यामुळे बाजारात शुकशुकाट होता.
दरम्यान, राजधानी पणजीला झोडपणारा आजचा हा पाऊस पणजी व पर्वरीपुरताच मर्यादित नव्हता तर राज्याच्या किनारी भागातही वृष्टी झाली. सत्तरी, सांगे, पेडणे या वनसंपत्तीक्षेत्रीय भागात हलकासा पाऊस पडला. या भागातील भात कापणी पूर्ण झाली असून पुढील दोन दिवसांत पाऊस पडल्यास गवत कापणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments: