Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 October, 2010

राष्ट्रीय महामार्ग आराखडा विरोधी आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा

सरकारचा कुटील डाव हाणून पाडा : प्रा.पर्वतकर
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तयार केलेला सध्याचा आराखडा हा गोव्याला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळेच या आराखड्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीने २ रोजी आयोजित केलेल्या मोर्चात भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची घोषणा भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी केली.
आज इथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. याप्रसंगी माजी आमदार सदानंद शेट तानावडे व माजी मंत्री विनय तेंडुलकर उपस्थित होते. केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी परस्परविरोधी विधाने करून आपले दुटप्पी धोरणच दाखवून दिले आहे. एकीकडे जनतेला हवा तसा महामार्ग बनेल, असे सांगितले जाते तर दुसरीकडे भूसंपादनाला गती मिळाली नाही तर निधी अन्यत्र वळवू अशी धमकीच कमलनाथ यांच्याकडून दिली जाते. हा जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रकार होय, असा आरोपही प्रा. पर्वतकर यांनी केला. जनतेच्या खिशातील पैशांचा वापर करून बांधण्यात आलेल्या सध्याच्या महामार्गाचेच रुंदीकरण करून त्यावर पुढील तीस वर्षे टोल आकारून हे सरकार जनतेला लुटण्याचे कारस्थान खेळत आहे; ते भाजप कदापि सफल होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी प्रा. पर्वतकर यांनी बोलून दाखवला.
२ रोजीचा मोर्चा हा केवळ प्रकल्पग्रस्तांसाठीच आहे असा समज कुणीही करून घेऊ नये. या महामार्गाचा फटका सर्वांनाच बसणार आहे व त्यामुळे गोव्यातील समस्त जनतेने या मोर्चात सहभागी होऊन सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. केवळ काही वर्षांपूर्वी सध्याच्या महामार्गालगत कायदेशीर बाबी पूर्ण करून घरे बांधलेल्या काही लोकांची घरे पाडण्यात येणार आहेत. राज्य सरकारचे नियोजन किती अर्थशून्य व दूरदृष्टीहीन आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे, असा टोलाही प्रा. पर्वतकर यांनी हाणला. प्रत्यक्षात येथील जमिनीचे दर गगनाला भिडले असताना या लोकांच्या हातात कवडीमोल नुकसान भरपाई सोपवली जाईल व त्यामुळे या लोकांनी करावे काय, याचे उत्तर मुख्यमंत्री कामत यांनी आधी द्यावे, असे आव्हानही यावेळी देण्यात आले. सर्व सनदशीर मार्गांचा अवलंब करूनही सरकारला जनतेच्या भावनांची कदर नसल्यानेच आता या प्रकरणाला आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सेझ, उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी आदी प्रकरणांत भाजपने राजकीय अस्तित्व बाजूला सारून जनतेच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे व त्याच पद्धतीने या आंदोलनालाही भाजपचे पूर्ण पाठबळ असणार आहे, असे ठोस आश्वासन प्रा. पर्वतकर यांनी यावेळी दिले.

No comments: