Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 1 November, 2010

साहित्यातून स्त्रीशक्ती दाखविण्याची गरज

महिला साहित्य संमेलनात डॉ. माधवी वैद्य यांचे प्रतिपादन
फोंडा, दि.३१ (प्रतिनिधी) - आपला समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महिलांनी हाती लेखणी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्या अंगातील सुप्त, सक्षम व सबळ ताकद साहित्याच्या माध्यमातून दाखविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन येथील शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने आयोजित आठव्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य (पुणे) यांनी येथे आज (दि.३१) दुपारी केले आहे.
येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित महिला साहित्य संमेलनात डॉ. माधवी वैद्य बोलत होत्या. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका श्रीमती फैय्याज शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती डॉ. अलका देव मारूलकर, स्वागताध्यक्ष सौ. सुषमा नार्वेकर, आयोजन समितीच्या अध्यक्ष माधवी देसाई, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन देव व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ. वैद्य म्हणाल्या की, स्त्रीत्वाचा धर्म म्हणजे दृष्ट शक्तीचा संहार आणि सृष्टांना तारून न्यायचे. महिलांनी या उपजत शहाणपणाचा विसर पडू देऊ नये. स्त्री ही कणखर व चिवट आहे. तिला भारतीय कुटुंब पद्धतीत मान आहे. जीवनातील ही लढाई साहित्यात सुध्दा दाखविण्याची नितांत गरज आहे. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने आपणाला भुरळ घातली आहे.आपणाला बोरकरांच्या साहित्याचे आकर्षण आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे सांगून डॉ. वैद्य म्हणाल्या की, मुले वाचनाकडे दुर्लक्ष करतात अशी पालकांची सर्रास तक्रार असते. आपण मुलांना काय देतो याचा विचार केला पाहिजे. मुलांनी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. तर पालकांनी सुध्दा आपले उत्तरदायित्व समजून घेऊन वागले पाहिजे, असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले.
गोव्यात साहित्यिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ह्या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत महिलांनी सुध्दा योगदान देऊन सकस साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे. गोव्यात साहित्य निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. संस्कृती संवर्धन, सकस निर्मिती व दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. आजच्या काळात माणुसकीची पडझड सुरू आहे. अशा ह्या काळात महिलांनी कणखर होणे आवश्यक आहे. महिलांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही संमेलनाध्यक्ष डॉ. वैद्य यांनी सांगितले.
महिलांनी छंद जोपासण्याचे कार्य केले पाहिजे. महिलांच्या अंगात विविध कला गुणांचा समावेश असतो. अशा ह्या संमेलनाच्या माध्यमातून सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळते, असे उद्घाटिका श्रीमती फैय्याज यांनी सांगितले. गोमंतक प्रदेश हा नाट्यवेडा असून गोव्यातील निसर्ग सौंदर्य, लाल माती आपणाला भुरळ घालते, असेही श्रीमती फैय्याज यांनी सांगितले.
वडिलांकडून मिळालेले जीवन ध्येय घेऊन आपण वाटचाल करीत आहे, असे सत्कारमूर्ती डॉ. अलका देव मारूलकर यांनी सांगितले. वडिलांच्या समवेत बालपणात देशाच्या विविध भागात भ्रमण करावे लागले. ज्या ज्या प्रदेशात गेले तेथील वातावरणाशी मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न केला, असेही डॉ. मारूलकर यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष सौ. सुषमा नार्वेकर यांनी स्वागत केले. आयोजन समितीच्या अध्यक्षा माधवी देसाई यांनी प्रास्ताविक केले. सौ.अरुणा भदोरिया, सौ. रेखा जोशी, सौ. प्रतिभा निगळ्ये, सौ.गीता सोमण, सौ. लक्ष्मी जोग, सौ. विजया दीक्षित यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते डॉ. अलका देव मारूलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. पूर्णिमा उसगावकर, सौ. लक्ष्मी जोग, सौ. रेखा उपाध्ये, कु. समृद्धी केरकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचा उत्कृष्ट महिला वाचक पुरस्कारांचे वितरण करण्यात आला. संस्थेचा प्रथम वाचक पुरस्कार श्रीमती मंदाकिनी उसगांवकर यांना प्राप्त झाला. दुसरा पुरस्कार सौ.नम्रता विर्नोडकर आणि तिसरा पुरस्कार सौ. प्राची जोशी यांना प्राप्त झाला आहे. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. नूतन देव यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, माधवी देसाई यांच्या हस्ते उद्घाटिका श्रीमती फैय्याज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या संमेलनानिमित्त खडपाबांध येथील विश्र्व हिंदू परिषद सभागृह ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन संगीत अभ्यंकर यांनी केले. शेवटी उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन डॉ. नूतन देव यांनी केले.

No comments: