Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 November, 2010

सोनाळ येथे खाणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर

रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण
वाळपई, दि.२(प्रतिनिधी): वाळपई पोटनिवडणुकीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घवघवीत यश प्राप्त करून आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता सत्तरीत नव्याने खाण व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे.
सत्तरीतील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील व निसर्गरम्य असे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या सोनाळ या गावात शंभर एकर जमिनीत खाण सुरू करण्याचा एक प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सत्तरीतील लोकांनाच खाण उद्योग हवा असेल तर विरोध करणारा आपण कोण, अशी जाहीर भूमिका मांडून वाळपई पोटनिवडणुकीत विश्वजित राणे यांनी बाजी मारली होती. आपला विजय म्हणजे आपल्या खाणविषयक भूमिकेला लोकांनी दिलेली मंजुरी असल्याचे वक्तव्यही त्यांनी केल्याने आता सोनाळ येथील खाणीबाबत ते नेमकी काय भूमिका घेतात हा चर्चेचा विषय बनला आहे. सावर्डे पंचायतक्षेत्रातील सोनाळ या गावात ही खाण सुरू करण्यासाठी हा प्राथमिक प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर या खाणीबाबत सार्वजनिक सुनावणी होणार आहे. दरम्यान, ही नियोजित खाण म्हादई अभयारण्य क्षेत्राच्या आरक्षित विभागात येतेच; शिवाय ही खाण म्हादई नदीच्या तीरावर येणार असल्याने त्याचे गंभीर दूरगामी परिणाम सत्तरीवर व पर्यायाने राज्यावर होण्याचा धोका पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जातो. सोनाळ गाव हा कुळागरे व शेती व्यवसायासाठी परिचित आहे. ही खाण सुरू झाल्यानंतर येथील गरीब लोकांनी कष्टाने उभारलेले हे दोन्ही व्यवसाय जवळ जवळ संपुष्टात येण्याचीच जास्त शक्यता असल्याने या गावातील लोक या खाण प्रकल्पाबाबत कोणत्या पद्धतीने विचार करतात व आपल्या आमदाराकडे नेमकी काय भूमिका मांडतात हा देखील महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
सत्तरी तालुक्यातील सुमारे ५८ गावांना पाणीपुरवठा करणारा दाबोस पाणी प्रकल्पही सोनाळ गावच्या जवळच येतो, त्यामुळे या नियोजित खाणीचा या प्रकल्पावर परिणाम होणार असल्याचा निष्कर्ष पर्यावरणवाद्यांनी काढला आहे.
गोवा फाउंडेशनतर्फे राज्यातील बेकायदा खाणींविरोधात दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हादई अभयारण्य क्षेत्रातील नियोजित खाणींचेही प्रस्ताव अडकले आहेत, या याचिकेवर सत्तरीतील खाणींचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, सोनाळ येथील नियोजित खाणीचा धोका लक्षात घेऊन त्याबाबत न्यायालयात धाव घेण्याची तयारीही काही पर्यावरणप्रेमींनी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

No comments: