Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 November, 2010

महामार्ग रुंदीकरण विरोधात आज सचिवालयावर मोर्चा

सरकारकडून मुस्कटदाबी; १४४ कलम लागू

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या विरोधात सचिवालयावर महामार्ग फेरबदल कृती समितीतर्फे उद्या मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात तमाम गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे. मात्र हा मोर्चा हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न आरंभले असून पणजी आणि पर्वरी भागात जमावबंदीचे कलम १४४ जारी करण्यात आले आहे.
उद्या २ तारखेला दुपारी १२ ते रात्री ११ पर्यंत सचिवालयापासून ५०० मीटरपर्यंत आणि पणजी पोलिस स्थानकाच्या हद्दीत जमावबंदी लागू केल्याचा आदेश आज (सोमवारी) उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी काढला. महामार्ग रुंदीकरण विरोधातील मोर्चाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वर्धन आदेशात म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीतर्फे दुपारी ३ वाजता आझाद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग "४ अ' आणि "१७ एनएच'चे रुंदीकरण म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप खासदार नाईक यांनी केला आहे. राज्य सरकारच्या विरोधात जाऊन केंद्र सरकार महामार्गासाठी जमीन ताब्यात घेऊच शकत नाही. जमीन ताब्यात घेण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारलाच असतात. याप्रश्नी केंद्रीय मंत्री कमलनाथ हे गोमंतकीयांना तसेच राज्य सरकारला "ब्लॅकमेल' करीत असल्याचा आरोपही श्री. नाईक यांनी केला.
महामार्गासाठी लागणारा पैसा हा जनतेच्या मालकीचा आहे. तो कॉंग्रेस सरकारचा किंवा कमलनाथ यांचा नाही. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणाला विरोध केला म्हणून या महामार्गाचा निधी परत केंद्राकडे जाईल ही कमलनाथ यांची बतावणी पूर्णतः खोटी आहे. जनतेच्या पैशातून हा महामार्ग साकार होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर टोल गोळा करणे कोणत्या आर्थिक नीतीत बसते, असा खडा सवालही श्री. नाईक यांनी केला.
या महामार्गामुळे राज्यातील पर्यावरणाला जबर फटका बसू शकतो. तसेच, गोव्याचे भौगोलिकदृष्टीने विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच या भयंकर प्रश्नावर आवाज उठवून त्यास विरोध करणे हे समस्त गोमंतकीयांचे आद्यकर्तव्य ठरते. या मोर्चास सर्वांनी उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन खासदार नाईक यांनी केले आहे.

No comments: