Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 June, 2010

कुणाच्या फायद्यासाठी ती घटना दडपली?

महेश पारकर, शिरोडा
(तालुकाः फोंडा)
नागरिक बातमीदार स्पर्धा

साधारणतः दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. घटनेची चर्चा गावातील आम जनतेमध्ये आजही चालू आहे. परंतु सदर घटना बातमी रूपांत किंवा अन्य स्वरूपात गोव्यातील वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकांत छापून आलेली नाही. कारण घटना जिथे घडली होती, ती संस्था गोव्यातील एक उच्च पदस्थ राजकीय व्यक्तीच्या मालकीची आहे ! तसेच सदर घटनेचा बोभाटा झाल्यास त्या संस्थेवरती होऊ शकणाऱ्या परिणामाबरोबर त्या उच्च राजकीय व्यक्तींच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी, यामुळेच ती घटना कसोशीने दडपली गेली आहे.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी वर्ग कर्मचारी वर्ग आपापल्या कामामध्ये दंग अन् इथे स्टाफरूम मध्ये एक प्राध्यापक काहीतरी काळेकृत्य करण्याच्या पावित्र्यात येरझारा टाकीत होते. शिरोड्यातील मध्यवर्ती भागातील ही संस्था. त्यामुळे भोवतालच्या पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी तिथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरील विद्यार्थिनी त्या खरे म्हणजे प्राध्यापकाला भगिनी किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलींसारख्या. परंतु आजची सामाजिक स्थिती विचित्र बनलेली आहे. सरळ सांगायचे म्हटल्यास टीव्हीच्या प्रभावामुळे, शारीरिक ओढीला आजकाल कसलाच ताळतंत्र राहिलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून असेल सदर प्राध्यापक महोदयांनाही तो मोह आवरला नसावा.
त्या मागची कारण मीमांसा आज लोक अनेक प्रकारे बोलून दाखवितात. कुणी म्हणतात, ती विशिष्ट विद्यार्थिनी परीक्षेला नापास होणार हे निश्चित होते. अशा तिच्या अगतिकतेच्या फायदा घेऊन तिला पास करायचे आमिष सदर प्रोफेसरांनी दाखविले. अन् संस्थेच्या भव्य अशा इमारतीच्या निर्मनुष्य ठिकाणी तिला नेऊन अतिप्रसंग केला. तो प्रत्यक्ष केला की प्रयत्न केला, याबद्दलही सर्वत्र साशंकाच आहे. कुणी म्हणतात की, या प्रोफेसराविरूद्ध आजवर अनेक तक्रारी दाखल झालेल्या असून, केवळ उच्चपदस्थांच्या आशीर्वादामुळे हा नामानिराळा राहू शकलेला आहे ! म्हणून हा कट अन्य शिक्षक वर्गानेच जाणून बुजून करविला असेही बोलले जाते.
खर खोटं देवास ठाऊक किंवा त्या प्रोफेसरला किंवा बदनाम झालेल्या मुलीला! परंतु घटनेनंतर लगेच त्या मुलीच्या सांगण्यावरून तिच्या भावाने तसेच अन्य कुटुंबीयांनी या उच्चशिक्षित प्रोफसराची भरपूर धुलाई केली. हे सगळ्या गावाने पाहिलं आहे. एरवी कृतिशील, थोेडासा प्रसिद्धी लोलूप अशी ही व्यक्ती, स्वतःच्या पेशाला काळिमा फासणारं कृत्य करायला कशी प्रवृत्त झाली? संस्थेचा प्रारंभापासून ही व्यक्ती म्हणजे अविभाज्य घटक! शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकून समाजात स्थिर झालेले आहेत. स्वतःच्या पेशाची पंचविशी पूर्ण करीत आलेल्या या व्यक्तीला ही अवदसा का आठवली असावी? अशा अचंब्याने लोकांच्या भुवया विस्तारल्या जात आहेत.
ती व्यक्ती जिथे त्याच्या कुटुंबीयांसह रहात होती तिथे ती सध्या नाही. कुणी म्हणतात, गोवा सोडून ती व्यक्ती अज्ञात स्थळी गेली असावी. तर कुणी म्हणतात, त्याला तसे करण्यास भाग पाडून संस्थेतील ही घाण दूर झाली हे बरेच झाले! संस्थेच्या व्यापक भविष्याच्या दृष्टीने त्याचा काटा काढला गेला असावा!
एवढी मोठी घटना घडून ही ती वर्तमानपत्रामधून लोकासमोर का आली नाही? ज्या घटनेचे चर्वितचर्वण सामान्य लोकांमध्ये होऊन ही एखाद्या वार्ताहराला त्याचा वास लागलाच नाही असे म्हणता येईल? संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सदर घटनेकडे पाहिल्यामुळे ती बातमी सर्वच वर्तमानपत्रांनी टाळली? असं असेल तर मग हे प्रोफेसरमहाशय अन्य ठिकाणी जाऊन तसलेच रंग उधळायला मोकळे! आणखी एखादे दुसऱ्या विद्यार्थिनीचा बळी द्यायला आपण त्याला परवाना दिल्यासारखं होणार नाही का!
वाचकहो, आपणही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. आपल्या परिसरातील एखादी घटना अथवा समस्या, संस्था यांच्याविषयी सुमारे ५०० शब्दांत बातमी पाठवून बक्षीस जिंका. पणजी, फोंडा, म्हापसा, काणकोण, वास्को, कुडचडे अथवा मडगाव कार्यालयात बातमी देऊन या स्पर्धेत भाग घ्या. अंतिम तारीख २५ जून २०१०

No comments: