Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 June, 2010

ऍंडरसनच्या पलायनास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी

भाजपचा ठराव

पाटणा, दि. १३ - हजारे निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या भोपाळ वायुगळती प्रकरणातील मुख्य आरोपी वॉरेन ऍण्डरसन याच्या पलायनास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा एकमुखी ठराव भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या येथे आयोजित बैठकीत आज पारित करण्यात आला.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या आशयाचा ठराव मांडला. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चौहान यांनी कायदे तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. कुठल्याही भारतीयाचे जीवन हे अमेरिका किंवा इतर देशाच्या नागरिकाच्या तुलनेत स्वस्त नाही. या दुर्घटनेतील पीडितांनी ज्या यातना भोगल्या त्याची योग्य दखल घेतली गेलीच पाहिजे. या पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलावी, असेही या ठरावात पुढे म्हटले आहे.
आत्मसन्मानाशी तडजोड नाही
- भाजपचा जदयुला इशारा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात नीतीशकुमार हात घालून असल्याची जाहिरात काल प्रकाशित झाल्यानंतर निर्माण झालेल्या मतभेदांबाबत पक्षाने परिपक्वतेची भूमिका घेतली असली तरी, आत्मसन्मानाशी कुठलीही तडजोड करणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने आज जदयुला दिला आहे.
परिपक्व नेतृत्व असलेला आमचा पक्ष आहे आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे आमचा आत्मसन्मान आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या मुद्यावर आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही, असे भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जदयूची नरमाईची भूमिका
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून असल्याची जाहिरात काल बिहारमधील अनेक वृत्तपत्रात झळकल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर आज जदयुने नरमाईची भूमिका घेतली असून, भाजपाशी असलेली आघाडी आणि संबंध अतिशय जुने असल्याचा निर्वाळा दिला आहे.
काल घडलेली घटना अतिशय दुर्देवी होती. भाजपाशी आमची आघाडी गेल्या पंधरा वर्षांपासून आहे आणि ती टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जदयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. एखाद्या जाहिरातीत पंतप्रधान अथवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र किंवा नाव प्रसिद्ध करायचे असल्यास त्यांची किंवा त्यांच्या कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे असते. ही जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वी जदयुशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नसल्याने आम्ही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ही जाहिरात पक्षाने प्रकाशित केली नसल्याचा खुलासा भाजपाने केल्यानंतर हे प्रकरण जास्त ताणून न धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, ही जाहिरात कुणी व कशी प्रकाशित केली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही शरद यादव यांनी सांगितले.

No comments: