Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 June, 2010

परदेशी गुन्हेगारांबाबत कॉंग्रेसचे नरमाईचे धोरण; भाजपची टीका

अर्जुनसिंग यांची प्रतिमा जाळली

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - भारतात गुन्हे करणाऱ्या परदेशी गुन्हेगारांविषयी कॉंग्रेस पक्ष सदोदित नरमाईची भूमिका घेते असा आरोप करून भोपाळ विषारी वायुगळती दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज केली. या घटनेसंबंधी २५ वर्षांनंतर लागलेला निवाडा पाहता या दुर्घटनेला जबाबदार लोकांना केवळ दोन वर्षांची सजा फर्मावली जाणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित वॉरन ऍंडरसन याला देशाबाहेर निसटण्यासाठी तत्कालीन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग व पंतप्रधान राजीव गांधी यांनी साहाय्य केल्याचा ठपका असून त्याचा तपास लागलाच पाहिजे, असेही श्री.आर्लेकर म्हणाले.
गोवा प्रदेश भाजपतर्फे आज मुख्यालयाजवळ भोपाळ वायू गळती दुर्घटनेबाबत निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संशयाच्या घेऱ्यात सापडलेले माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्या पुतळ्याचे दहन करून भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा निषेध केला. याप्रसंगी श्री.आर्लेकर बोलत होते.
भोपाळ येथे १९८४ साली वीज हजार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाइडचा तत्कालीन अध्यक्ष वॉरन ऍंडरसन हा दुर्घटना घडताच देशाबाहेर निसटलाच कसा,असा सवाल श्री.आर्लेकर यांनी केला. त्याच्या निसटण्यास अर्जुनसिंग व राजीव गांधी हेच जबाबदार असल्याचे उघड होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे सरचिटणीस प्रा.गोविंद पर्वतकर यांनी आपल्या भाषणांत भोपाळ वायू गळती दुर्घटनेची चौकशी करण्यास जवळजवळ २५ वर्षे लागली व शिक्षा मात्र २ वर्षे हा निकाल असमाधानकारक असून एक प्रकारे समस्त भारतीयांचा अवमान असल्याचे उद्गार काढले. ऍंडरसन याला निसटण्यासाठी सरकारी सुरक्षा कवच कोणी प्रदान केले, त्याला दिल्लीला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय कुणी केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समस्त देशवासीयांना मिळालीच पाहिजेत, अशी मागणीही यावेळी प्रा.पर्वतकर यांनी केली.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष केशव प्रभू, सचिव सदानंद शेट तानावडे, आमदार दिलीप परूळेकर, रूपेश कामत, वैदही नाईक, रूपेश हळर्णकर, विठू मोरजकर, ज्योती मसुरकर, भगवान हरमलकर, प्रमोद कामत, विजय चोडणकर, दिना बांदोडकर, प्रसाद प्रभुगावकर, आत्माराम बर्वे, सिद्धेश नाईक, अखिल पर्रीकर आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पणजी मंडळ अध्यक्ष पुंडलिक राऊत देसाई यांनी केले.

No comments: