Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 June, 2010

"चांगल्या मराठी चित्रपटांना आता रसिकांनी साथ द्यावी'

परिसंवादातील सूर
पणजी, दि. १३ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - मराठी चित्रपटांना आज चांगले दिवस आले आहेत. ज्वलंत आणि वेगळ्या चित्रपटांची लाट निघाली असून त्याला रसिकांनी साथ देणे आवश्यक आहे. असा सूर "प्रादेशिक चित्रपट अपेक्षा आणि वास्तव' या चर्चासत्रात निघाला.
मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटांचा दर्जा खालावत गेल्याने रसिक प्रेक्षक मराठी चित्रपटापासून दूर झाला होता त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज पुन्हा मराठी चित्रपटांची निर्मिती दर्जेदार होत असल्याने मराठी चित्रपटसृष्टी नवी उंची गाठेल यात शंकाच नाही. आज तरुण दिग्दर्शक नव्या जोमाने वैचारिक पातळीवरील उच्चस्तरीय चित्रपट तयार करत असून ही नव्याने आलेली लाट टिकून राहण्याकरिता मराठी प्रेक्षकांनी पाठिंबा देणे नितांत गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त झाले.
विन्सन ग्राफिक्सने दोन दिवस आयोजित केलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात आज "प्रादेशिक चित्रपट अपेक्षा आणि वास्तव' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे, निरोप चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर, विहीर चे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, पांगीराचे दिग्दर्शक राजू पाटील, अभिनेता आणि दिग्दर्शक नंदू माधव, गोव्यातील दिग्दर्शक ज्ञानेश्र्वर गोवेकर, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी भाग घेतला होता.यावेळी प्रेक्षकातूनही अनेक प्रश्न विचारण्यात आले. चर्चासत्राचे संयोजन श्रृती पंडित यांनी केले होते. यावेळी सचिन कुंडलकर म्हणाले की कित्येक वेळा अपेक्षा काहींवेगळ्या असतात आणि वास्तव काहींवेगळे असते अपेक्षा आणि वास्तव यात दुरी असणे आवश्यक आहे कारण दिग्दर्शक किंवा निर्माता आपली आवड म्हणून चित्रपट तयार करत असतात. अपेक्षा पूर्ततेसाठी प्रेक्षकांनी तक्रारी कराव्यात अस वाटते. आज मराठी चित्रपट सृष्टीत झालेला बदल हा एकट्यामुळे किंवा एका चित्रपटामुळे झालेला नाही आणि तसे होणे शक्य नाही, असे उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. नव्या दमाचे आणि नवे विचार घेऊन पुढे सरसावलेल्या तरुण दिग्दर्शकांना मनापासून जे करायचे आहेे ते करण्यासाठी पोषक वातावरण आहे, असेही ते म्हणाले. सिनेमाला कोणत्याही भाषेचे बंधन असू नये, कारण दिग्दर्शक सिनेमाच्या भाषेतून अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतो. मोहन आगाशे म्हणाले की केवळ चित्रपट तयार करायचा म्हणून करायचा असे करून आज वर्षाला सुमारे १६७ मराठी चित्रपट तयार होणे हा भयंकर अतिरेक होत आहे, त्यामुळे चांगल्या चित्रपटांना योग्य जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रेक्षक चांगल्या चित्रपटांकडे वळत नाही. तरी सुध्दा चांगले चित्रपट राहतील आणि चालतीलही. आज लोकांकडे पर्याय खूप आहेत परंतु वेळ आणि पैसा कमी आहे, असे मिस्कीलपणे ते म्हणाले.नंदू माधव आणि महेश मांजरेकर यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, की चित्रपटांचा होणाऱ्या अतिरेकामुळे प्रेक्षक दूर जात होते आणि आता पुन्हा तोच प्रकार घडण्याच्या मार्गावर जात आहे. त्यामुळे सरकारकडून चित्रपट निर्मितीसाठी मिळणाऱ्या सवलती वरदानाबरोबरच शापही ठरतात त्या चित्रपटांना मोठा धोका म्हणजे वेळेअभावी तयार होणाऱ्या डी.व्ही.डी. याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. शेवटी श्रृती पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments: