Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 June, 2010

सीबीआयच्या गैरवापराची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करा

भारतीय जनता पक्षाची मागणी

पाटणा, दि. १२ - सीबीआयचा सध्या राजकीय स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे, अशी चौफेर टीका देशातील या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेवर होत असल्यामुळे या साऱ्या प्रकाराचे पोस्टमार्टम करण्यासाठी संयुक्त सांसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकविण्यासाठी, तसेच राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांना आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेस व संपुआ सरकारने सीबीआयचा अनेक वेळा गैरवापर केला आहे, असा आरोपही भाजपातर्फे लावण्यात आला आहे.
१६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाटणा येथे आज शनिवारीपासून सुरू झालेल्या भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी ही मागणी केली आहे. सीबीआय हे आज लोकांना धमकाविण्याचे आणि कोणत्याही प्रकरणात अडकविण्याचे एक आयुध झालेले आहे. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे भोपाळ वायुगळती प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्याने उघड केलेले रहस्य आहे. या वायुगळती कांडातील मुख्य आरोपी वॉरेन ऍण्डरसन याला देशातून पळवून लावण्यासाठी सीबीआयचा कसा गैरवापर करण्यात आला, याचा खुलासा सीबीआय अधिकाऱ्यातर्फे नुकताच करण्यात आलेला आहे.
गडकरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीला जे संबोधन केले त्याची माहिती नंतर एका पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ता रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. गुजरातमध्ये आज एकापेक्षा एक धाडसी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. एवढेच नव्हे तर गुजरातमधील भाजपाशासित सरकारलाही सीबीआयच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात बनावटी चकमकीच्या अनेक घटना घडत असताना तेथे मात्र काहीच केले जात नाही आणि दुसरीकडे गुजरातला मात्र याच प्रकरणी उगाचच लक्ष्य केले जात आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष देशात आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी आणि क्वात्रोची व ऍण्डरसनसारख्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी सीबीआयचा खुलेआमपणे दुरुपयोग करीत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कॉंग्रेसची प्रतिबद्धता ही देशवासीयांप्रती नाही, असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळेच सीबीआयच्या कामकाजाचे पोस्टमार्टम करण्यासाठी या विभागाच्या गैरवापराची चौकशी करण्यासाठी जेपीसीची त्वरित स्थापना करावी, अशी मागणीही गडकरी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वात "बिमारू बिहार'ला "जुझारू बिहार'मध्ये परिवर्तित केल्यामुळे राज्यातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा याच नेतृत्वाच्या हाती पुढील पाच वर्षांसाठी सत्ता सोपवावी, असे आवाहनही गडकरी यांनी राज्यातील जनतेला केले आहे. भाजपा-जदयुच्या शासन काळात राज्यात विकासाचा झंझावात सुरू झालेला आहे. हा झंझावात सुरू ठेवण्यासाठी आणि अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी या युतीला पुन्हा निवडून द्या, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. राज्यात प्रथमच एक असे सरकार आले आहे की जे जनतेला अनुरूप काम करीत चांगले परिणाम देत आहे, असेही गडकरी म्हणाले.
गेल्या शासन काळात बिहारला केवळ निंदाच सहन करावी लागली होती. आता मात्र रालोच्या युती शासन काळानंतर राज्यातील विकास कामांमुळे जनतेचीही मानही उंचावली आहे. बिहारचा विकास दर ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि हे एक आश्चर्य आहे, असेही गडकरी यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.

No comments: