Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 16 April, 2010

दंतेवाडा हत्याकांडावरून लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली, दि. १५ : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशाच्या "उत्तरार्धा'ला आजपासून सुरुवात झाली. छत्तीसगढमधील दंतेवाडाच्या जंगलात सीआरपीएफच्या ७५ जवानांच्या झालेल्या हत्याकांडावरुन तसेच माओवाद्यांशी राजकीय पक्षांचे साटेलोटे असल्याच्या आरोपांवरून संसदेत पहिल्याच दिवशी वादळी चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्याने मोठा गदारोळ झाला.
""आंध्रप्रदेशमील विधानसभेची निवडणूक कॉंग्रेसने नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करूनच जिंकली, असा स्पष्ट आरोप भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी सभागृहात केला. या आरोपांचे संतप्त पडसाद उमटलेत. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या आरोपाचा निषेध केला. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बंसल आणि कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी भाजपाशासित राज्यांमध्येही राज्य सरकारचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे आरोप केले. यशवंत सिन्हा यांच्या आरोपांचा निषेध करून कॉंग्रेस सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. त्याला भाजपा सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने प्रचंड गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी "सभागृहात नक्षलवादाच्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असल्यामुळे ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. या समस्येच्या निर्मूलनासाठी काय करता येईल, याचा विचार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन चर्चा करावी,' असे आवाहन करताना यशवंत सिन्हा यांना "पुराव्यांनिशी सिद्ध करता येऊ न शकणारे आरोप करू नका,'अशी समज दिली.
तत्पूर्वी, यशवंत सिन्हा यांनी कॉंग्रेसचा गोंधळ उडविणारा मुद्दा उपस्थित केला. "केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् हे माओवाद्यांचा मुद्दा कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्याप्रमाणेच हाताळत आहेत,' अशी टीका अ. भा . कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली होती. या मुद्यावर सरकारने स्पष्टोक्ती द्यावी, अशी मागणी सिन्हा यांनी उचलून धरली. "नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत विरोधी पक्ष सरकारच्या पाठिशी आहे,'अशी ग्वाही देताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा पुढे सवाल करताना म्हणाले की, "या लढाईत सरकारच्या पाठिशी संपुआ आणि कॉंग्रेस आहे का?'

No comments: