Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 April, 2010

सावर्डेत येणाऱ्या खाणींमुळे सत्तरीचे अस्तित्व धोक्यात

खाणविरोधी सभेत राजेंद्र केरकर यांचे प्रतिपादन

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रात एकूण चार नियोजित खाणींचे संकट घोंगावत असून या चारही खाणी झाल्यास सावर्डे पंचायत क्षेत्राबरोबरच सत्तरी तालुक्याचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी प्रा.राजेंद्र केरकर यांनी केले. सावर्डे खाणविरोधी समितीतर्फे सावर्डे-सत्तरी येथे आयोजिण्यात आलेल्या खाणविरोधी सभेत प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सावर्डे खाणविरोधी समितीचे अध्यक्ष रघू गावकर, सामाजिक कार्यकर्तेरणजित राणे, लवू गावकर, बोंबी सावंत, नारायण नाईक, अमृतराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. केरकर म्हणाले या खाणींना एकजुटीने आणि राजकीय मतभेद विसरून आताच विरोध केला नाही तर सावर्डेतील जलस्त्रोत, नद्या, ओहोळ, काजूबागायती, कुळागरे, पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. सावर्डेत चार बडी आस्थापने नियोजित खाणींसाठी प्रयत्न करत आहेत. या चारही खाणी झाल्यास सत्तरी तालुक्यात शेजारील कर्नाटकाप्रमाणे पाण्यासंदर्भात भीषण परिस्थिती उद्भवणार आहे. कर्नाटक राज्यातील अनेक जंगले खाणींमुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे तेथे पाण्यासाठी लोकांना मैलोन्मैल भटकावे लागत आहे.
मये भागात २८ विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर असे समजले की, खाणींमुळे तेथील विहिरी आटत चालल्या आहेत. पाळी, वेळगे, पिसुर्ले आदी भागात हेच दृश्य दिसून येते. राजकीय वरदहस्ताने सत्तरी तालुक्यात खाणींसाठी प्रयत्न सुरू आहेत. खाणींविरोधात लढताना लोकांना नोकरींच्या पैसा आणि अन्य आमिषे दाखवली जातील. तथापि, कोणीही अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रा. केरकर यांनी केले.
रघू गावकर म्हणाले की, खाणींमुळे आज आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या अस्तित्वावरच जर कोणी घाला घालत असेल तर आम्ही अजिबात गप्प बसणार नाही. कोणत्याही त्यागाला आमची तयारी आहे. रणजीत राणे म्हणाले की, सरकारने आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये. आठ वर्षांपूर्वी आम्ही एकजुटीने सावर्डेतून खाणीला हाकलून लावले होते याचे भान सरकारने ठेवावे.
बोंबी सावंत म्हणाले की, तशीच जर वेळ आली तर ते आंदोलन पूर्ण सत्तरीभर नेले जाईल. सत्तरीच्या लोकांना गुलाम बनविण्याचे दिवस संपले आहेत.
यावेळी लवू गावकर, अमृतराव देसाई, नारायण नाईक यांनीही खाणविरोधी लढ्याला प्राणपणाने विरोध करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सूत्रनिवेदन व आभार प्रदर्शन रघू गावकर यांनी केले.

No comments: