Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 15 April, 2010

गायब अमली पदार्थाच्या चौकशीचे आदेश जारी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडलेला २८० किलोचा चरस गायब झाल्याने त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी आज पत्रकारांना सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हा अन्वेषण विभागाने मालखान्यातील २८० किलो चरस गायब असल्याचे म्हटले असून "दै. गोवादूत'ने या विषयीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आज रवी नाईक यांना या संदर्भात छेडले असता या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
"मी संपूर्ण अहवाल मागितला आहे. मालखान्याची जबाबदारी ज्यांनी सांभाळली होती त्यांच्याकडून आजपर्यंत मालखान्यात किती अमली पदार्थ आला आणि किती अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली, याची नोंदवून ठेवलेली माहितीही मागवण्यात आली आहे. तसेच, बंद असलेल्या ड्रग पाकिटांना "वाळवी' कशी लागली, हेही पाहिले जाणार असल्याचे श्री. नाईक म्हणालेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, की फरार असलेल्या "त्या' निलंबित पोलिसाने स्वतःहून शरण आले पाहिजे. तो जेवढा पोलिसांपासून लपून राहणार तेवढा जास्त कचाट्यात सापडणार. त्याने म्हापसा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, याचाही माहिती मला मिळाली आहे. त्याने शरण आलेच पाहिजे, असे श्री. नाईक म्हणाले.
संजय परब हा फरार असून त्याला अटक करण्यास गुन्हा अन्वेषण विभागालाही अपयश आले आहे. सुमारे एका महिन्यापासून पोलिस त्याच्या शोधात आहे. आठ दिवसांपूर्वी त्याची दुचाकी पोलिसांना बांबोळी येथे सापडली होती.

No comments: