Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 16 April, 2010

राष्ट्रीय महामार्गाच्या ४५ मीटर रुंदीकरणास केंद्राची मान्यता

धार्मिक स्थळे अबाधित राहतील
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पणजी ते मोले या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या ज्या ठिकाणी अडथळे येत आहेत त्या त्या ठिकाणी केवळ ४५ मीटरचेच रुंदीकरण केले जाईल तर अन्य ठिकाणी ६० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, हे रुंदीकरण करत असताना कोणत्याही धार्मिक स्थळांना हात लावला जाणार नाही, असे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आज महामार्ग केंद्रीय समितीचे अध्यक्ष सुभाष पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला असून केंद्राने त्याला मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता वाचासुंदर व मुख्य अभियंता चिमुलकर उपस्थित होते. या समितीची दुसरी बैठक येत्या महिन्यात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या महामार्गाच्या बांधणीसाठी येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागवलेल्या निविदा उघडल्या जाणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सर्वांत आधी तळपण आणि गालजीबाग येथील प्रस्तावित पुलांचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी श्री. आलेमाव यांनी दिली. भोमा येथे रुंदीकरणाच्या कारणास्तव अनेक घरे पाडावी लागणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी येथील लोकही तयार झाले आहेत. यात काहींचे पुनर्वसन करावे लागणार असून त्यासाठी येणारा सर्व खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोले ते पणजीपर्यंतचा हा रस्ता सुमारे ७५ कि.मी.चा असून यात सुमारे १२ किलो मीटरचा भाग राखीव जंगल क्षेत्रात येतो. त्यामुळे रुंदीकरणाच्या वेळी काही झाडे कापावी लागणार आहेत. यासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. आलेमाव यांनी सांगितले. चौपदरी महामार्गासाठी लागणारी सुमारे ६४ टक्के जागा बांधकाम खात्याच्या ताब्यात असल्याची माहिती श्री. वाचासुंदर यांनी यावेळी दिली.

No comments: