Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 15 April, 2010

खाजगी बसमालकांच्या पोटावर लाथ मारून कदंबला संजीवनी

अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचा आरोप
तिकीट वाढीबाबत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेतर्फे डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे तिकीट दरांत किमान २० पैशांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार १६ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रस्ताव आता त्यांना सादर करण्याचे संघटनेतर्फे ठरवण्यात आले आहे. कदंब महामंडळातर्फे अलीकडेच पणजी - साखळी मार्गावर शटलसेवा सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करून भ्रष्टाचारामुळे डबघाईस आलेल्या कदंब महामंडळाला वाचवण्यासाठी आता खाजगी बसमालकांच्या पोटावर लाथ मारण्याचा हा प्रकार निव्वळ अमानुषपणाचा भाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी यासंबंधीची माहिती दिली. डिझेलच्या दरांत वाढ झाल्याने तिकीट दरांत काही प्रमाणात वाढ होणे अपरिहार्य आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरांतील वाढ व एकूण महागाई यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे व त्यात तिकीट दरातील वाढ या लोकांना मानवणार नाही, याचे पूर्ण भान संघटनेला आहे व त्यामुळेच केवळ २० पैशांची वाढ व ती देखील जादा अंतराच्या मार्गावर सुचवण्यात आली आहे. बहुतांश खाजगी बसमालक हे देखील आम आदमीच्या यादीतच येतात व त्यामुळे या महागाईचा फटका त्यांनाही सहन करावा लागतो. बस व्यवसाय करूनच हे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. डिझेल दरातील वाढ, सुटे भागांचे चढते दर व वाहतूक खात्याच्या गैरकारभारामुळे लागलेली स्पर्धा यामुळे खाजगी बसमालकही संकटात सापडले आहे. कर्जाचे डोंगर वाढत असून कर्जाचे हप्ते व कुटुंबाचा खर्च यांचा ताळमेळ घालणेच अशक्य बनत असल्याची चिंताही यावेळी श्री. ताम्हणकर यांनी बोलून दाखवली.
पणजी - साखळी मार्गावर कदंब महामंडळातर्फे अलीकडेच नवीन शटलसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आपोआपच खाजगी बसमालकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. ही सेवा सुरू करताना खाजगी बसमालकांच्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होणार याचा जराही विचार जर हे सरकार करणार नसेल तर या खाजगी बसमालकांना पोसण्याची जबाबदारीही त्यांनीच उचलावी असे श्री. ताम्हणकर म्हणाले. सरकार खाजगी बसमालकांच्या पोटावर पाय ठेवून कदंबला वाचवण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपल्या अस्तित्वासाठी प्रतिकार करण्याचा पूर्ण अधिकार या बसमालकांनाही आहे. या बाबतीत सरकारने चर्चेअंती तोडगा काढणेच शहाणपणाचे ठरेल, असा गर्भित इशाराही यावेळी श्री. ताम्हणकर यांनी दिला आहे.

No comments: