Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 15 April, 2010

मडगावात आगीचे थैमान

४ दुकाने खाक; लाखोंची हानी; आठवडाभरातील दुसरी घटना
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): आज अग्निशमन दिनाच्याच मुहूर्तावरच मडगाव बाजारपेठेत आगीने भीषण तांडव मांडले आणि ती विझवण्यासाठी अग्निशामक दलाला मोठीच धावपळ करावी लागली. मडगाव बाजारपेठेलगत आज भर दुपारी भडकलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली व त्यात लाखो रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली. दुपारी ३ वा. भडकलेली ही आग एवढी भीषण होती की ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल १५ बंब पाणी वापरावे लागले.
दोनच दिवसांपूर्वी येथील जुन्या मासळी मार्केटमधील राजाध्यक्ष टॉवरमधील अंबिका फास्ट फूड सेंटरला लागलेल्या आगीपाठोपाठ मडगावात आज परत एकदा भयानक आगीने घातलेले थैमान पाहावयास मिळाले. आग नेमकी कशी लागली ते कळू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट हेच त्यामागील कारण मानले जात आहे. या आगीत मुंज बंधूंचे वृत्तपत्र विक्रीचे दुकान, स्टेशनरी स्टोअर्स व नित्यानंद ट्रान्स्पोर्ट एजन्सी तसेच सतीश वेर्लेकर यांचे सराफी दुकान अशी चार दुकाने जळून खाक झाली. ही दुकाने ज्यात आहेत ते घर श्रीकृष्ण मुंज यांचे असून त्यांचे तीन पुत्र सध्या त्याची व्यवस्था पाहतात. हे बंधू घोगळ येथे राहतात व या घराचा वापर दुकान व अन्य व्यवहारासाठी केला जातो.
हे घर सुमारे दीडशे वर्षांहूनही जुने असून स्टेशनरोडपासून पाठीमागे गांधीमार्केटपर्यंत त्याची व्याप्ती आहे. त्याला एक राजांगणही आहे. दुपारी ही घटना घडली तेव्हा मुंज यांची सदर दुकाने बंद होती पण समोरची दुकाने मात्र उघडी होती. त्यांनी छपरातून धूर येत असल्याचे पाहून पोलिसांना वर्दी दिली व पोलिसांनी अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दल निघाले पण पिंपळ पेडाकडील सर्व मार्ग फेरीवाले व अन्य विक्रेत्यांनी अडविलेले असल्यामुळे दलाला वेळीच घटनास्थळी पोहोचता आले नाही. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते व घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले.
अखेर वाट काढून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. परंतु, आगीचा भडका जबरदस्त असल्याने त्यांनी शेजारील कामत बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर जाऊन दुर्घटनाग्रस्त घराची कौले काठीने फोडली व पाण्याचा मारा केला. तोपर्यंत आगीची भीषणता लक्षात घेऊन वेर्णा, फोंडा व कुडचडे येथूनही अग्निशामक दलांना पाचारण केले गेले. मडगाव बाजारपेठेतील हैट्रोड्ंटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याची कुलुपे उघडत नसल्याचे आढळून आले. शेवटी ते फोडले असता पाण्याला दाब नसल्याचे दिसून आले. अशा प्रकारे ३ वा. लागलेली आग विझविण्याची मोहीम संध्याकाळी ६.३० पर्यंत सुरू होती. त्यासाठी एकूण १५ बंब पाणी वापरावे लागले व त्यातील ७ बंब मडगाव केंद्रातील होते असे सांगण्यात आले.
सदर घराला दाट फळ्यांची व मोठ्या तुळयांची माडी होती जी संपूर्णतः खाक झाली. नित्यानंद ट्रान्स्पोर्टकडे आलेले लोकांचे सामान, वृत्तपत्र व स्टेशनरी दुकानाचे सामान संपूर्णतः जळाले. ही मंडळी जेवणासाठी दुकाने बंद करून घरी गेलेली असल्याने कोणतेच सामान वाचले नाही; मात्र सतीश वेर्लेकर यांचे दुकान अर्धवट जळाले असे सांगण्यात आले.
अग्निशामक दलाच्या म्हणण्याप्रमाणे ४ ते ५ लाखांची हानी झाली आहे तर मुंज यांच्या दाव्याप्रमाणे ती कितीतरी अधिक आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आमदार दामोदर नाईक, नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो, मुख्याधिकारी प्रसन्न आचार्य, नगरसेवक राजेंद्र आजगावकर, राजू हॅडली, मंजूषा कासकर, राधा कवळेकर आदींनीही घटनास्थळी भेट दिली. आग विझविण्याच्या कामात बाजारकर संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आगीला नगरपालिका व संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

No comments: