Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 April, 2010

महामार्ग फेरआढावा समितीचे अध्यक्षपद रवी यांनी फेटाळले

"कुर्टी भागात नवीन रस्त्याची गरज नाही'

फोंडा, दि. १० (प्रतिनिधी) - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) च्या रुंदीकरणाबाबत फेरआढाव्यासंबंधीच्या समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास गृहमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी नकार दर्शवला आहे. काल पर्वरी येथील मंत्रालयात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चिल यांनी या समितीची घोषणा केली होती. त्यावेळी कसलेही आढेवेढे न घेता स्वीकारलेले हे अध्यक्षपद रवींना नेमके का सोडावेसे वाटले यावरून मात्र फोंड्यात चर्चा रंगू लागलीआहे.
रवी यांनी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येते व त्यामुळे या अभ्यास समितीचे अध्यक्षपद मंत्री चर्चिल यांनीच स्वीकारले पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला आहे. आपण केवळ एक सदस्य या नात्याने या समितीवर राहू, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
दरम्यान, या समितीच्या अध्यक्षपदासाठी आपली निवड करताना आपणास विश्र्वासात घेण्यात आले नाही, असा दावा त्यांनी करून यासंबंधीचे एक पत्रच श्री. आलेमाव यांना आपण पाठविल्याचे सांगितले.
कुर्टी भागातून पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, पण चिरपुटे - कुर्टी - मिलिटरी, खांडेपार असा नवीन मार्ग तयार करण्याबाबत काही वर्षापूर्वी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सदर भागातून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतल्यास त्याला बराच अवधी लागेल. कुर्टीतील ४५ मीटर जागा रस्ता रुंदीकरणावर लोक समाधानी आहेत. यामुळे बांधकामे मोडावी लागणार नाहीत. त्यामुळे कुर्टी भागात नवीन रस्त्याची गरज नाही, असा दावा रवी यांनी केला.
कुर्टीतील तीन किलो मीटर जागेतून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे ही बांधकामे मोडावी लागणार नाहीत. हा राष्ट्रीय महामार्ग तयार करताना लोकांची घरे, धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी १९९२ साली जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे कुर्टी भागातील बांधकामे ही बांधकाम खात्याकडून ना हरकत दाखला घेऊनच उभारली आहेत. ६० मीटर ची जमीन संपादित केल्यास मोठ्या प्रमाणात बांधकामे मोडावी लागतील, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री रवी व खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी फोंडा येथे या महामार्गाबाबत एक बैठक बोलावली होती व त्यात सा. बां. खात्याच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. या बैठकीला मंत्री चर्चिल यांना मात्र आमंत्रित केले नसल्याने ही बैठकच बेकायदा होती, असा दावा आलेमाव यांनी केला होता. खुद्द रवी नाईक यांच्या उपस्थितीतच त्यांनी हा दावा केल्याने त्यामुळे नाईक यांचीही गोची झाली होती.

No comments: