Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 16 April, 2010

सीबीआयची सारवासारव

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): 'इफ्फी २००४' मधील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची जबानी नोंदविलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण होण्याआधीच त्यावर बोलणे अपरिपक्वपणाचे ठरेल, असे सांगून आज पत्रकारांचा ससेमिरा चुकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
तथापि, पत्रकारांनी सीबीआयचे अधीक्षक एस. एस. गवळी यांना पर्रीकरांच्या आजच्या चौकशीसंदर्भात निवेदन करण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनी केवळ त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे आम्हांला हवी होती म्हणून आज त्यांना बोलावले होते; त्यांच्या निवेदनाबद्दल आताच काही सांगणे गैर ठरेल व त्याचा आमच्या तपासावरही परिणाम होईल अशी सारवासारव त्यांनी केली.
पणजी पोलिसांत दाखल झालेल्या प्रथम दर्शनी अहवालात पर्रीकरांचेच नाव आहे. तथापि, चौकशीअंती त्यात आणखी कोणी आहेत का ते कळेल. पण या घडीला त्याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही, असे गवळी म्हणाले. २००४ मधील इफ्फीचे सल्लागार, कंत्राटदारांचीही चौकशी करावी लागेल. त्या आधीच या प्रकरणावर भाष्य करता येणार नाही, असे सांगणाऱ्या गवळींनी आरोपपत्र कधी दाखल होईल हे सांगण्यासही नकार दिला.
अजून आम्हांला बऱ्याच गोष्टींचा तपास करावयाचा आहे असे गवळी म्हणाले. इफ्फीच्या भ्रष्टाचारासंदर्भात आधीच्या तक्रारीचे काय झाले व त्याचा निष्कर्ष काय काढला या पत्रकारांच्या प्रश्नावर ही एकच तक्रार सीबीआयकडे असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
आत्तापर्यंत सुमारे पस्तीस जणांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील बारा व्यक्ती या तत्कालीन कोअर समितीचे सदस्य होते एवढीच काय ती ठोस माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातील कितीजण सध्याच्या सरकारातील मंत्री आहेत हे सांगण्यासही या अधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच सध्याच्या सरकारातील काही मंत्री त्यावेळच्या कोअर समितीत होते. पर्रीकरांसारखेच त्यांनाही चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात बोलावले होते की अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची जबानी नोंदविली या प्रश्नाचेही उत्तर देण्याचे गवळींसह त्यांच्या चौकशी पथकाचे अधिकारी आर. के. ऋषी व अशोक यादव यांनी टाळले.
पर्रीकरांची आज आम्ही केवळ जबानी नोंदवून घेतली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आम्हांला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगून गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल, असेही ऋषी यांनी स्पष्ट केले.

No comments: