Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 March, 2010

कचरा व्यवस्थापनाचा गोव्यात पूर्ण बोजवारा

केंद्रीय मंत्री सेलजा यांनी कामत सरकारला फटकारले

पणजी, दि. ६(प्रतिनिधी) - जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याला वर्षाकाठी सुमारे साडेचार लाख विदेशी पर्यटक भेट देतात. देशी व विदेशी पर्यटकांची वार्षिक संख्या इथल्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट आहे. मात्र राज्यात कचरा व्यवस्थापनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याने पर्यटनाच्यादृष्टीने हा चिंतेचा विषय बनल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री कुमारी सेलजा यांनी स्पष्ट केले. एकप्रकारे त्यांनी गोवा सरकारच्या भोंगळ कारभाराची हजेरीच घेतली.
पश्चिम विभागीय पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्यांनी गोव्यातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापनाची दुर्दशा हे पर्यटनासमोरील मोठेचआव्हान आहे. हा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी पर्यटनमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पर्यटकांचा ओघ वाढेल तशी कचऱ्याची समस्या बिकट होत जाईल, त्यामुळे कचरा विल्हेवाट यंत्रणा राबवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी, अशी सूचना त्यांनी केली.
वनक्षेत्र व वन्यजीव विभागाचे सरंक्षण हवे
पर्यटनाचा विकास करताना त्याचा फटका वने व वन्यजीव क्षेत्राला बसणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय पर्यटन सचिव सुजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. पर्यटन उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाची सोय झाली आहे. या उद्योगाचा विस्तार होण्यासाठी समाज अधिकाधिक संवेदनशील बनवण्याकामी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खात्यातर्फे आयोजित केलेल्या "रोड शो'प्रसंगी ते बोलत होते. या रोड शोमध्ये देशातील पर्यटनविषयक अनेक संस्था व उद्योजक सहभागी झाले होते. पर्यावरण हा पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरणाचा सांभाळ करूनच पर्यटनाचा विकास व्हायला हवा. केंद्रीय मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेला या पद्धतीचा हा चौथा रोड शो होता. यापूर्वी पश्चिम बंगाल, बंगळूर व बुद्धगया याठिकाणी अशा रोड शोंचे आयोजन करण्यात आले होते.
"रोड शो'त पर्यटक सुरक्षेवरच भर
अलीकडच्या काळात विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेवरून निर्माण झालेल्या अनेक घटनांमुळे गोव्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या घटना टाळण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पर्यटकांशी संबंधित प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली. गोव्यात किनारी सुरक्षा व्यवस्थापनाचा कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवला जात असल्याचेही ते म्हणाले.
पर्यटन सचिव डॉ. एम. मुदास्सीर यांनीही विचार मांडले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त किनारी पोलिस स्थानक स्थापन करण्याचीही योजना विचाराधीन असल्याची माहितीही देण्यात आली.

No comments: