Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 March, 2010

जिल्हा पंचायतींसाठी मतदान ५७.२२ टक्के

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज पाच वाजता मतदानपेटीत सीलबंद झाले असून संपूर्ण राज्यात ५७ .२२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयुक्त पी एम. बोरकर यांनी दिली. या मतपेट्यांत बंद झालेले उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीनंतर दि. ९ (मंगळवारी) रोजी ठरणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यात एकूण ४८ जागांसाठी मतदान झाले. कळंगुट आणि नुवे येथे तणाव सोडल्यास अन्य ठिकाणी शांततेत मतदान झाले.
१९० मतदारांचे भवितव्य या मतपेटीत बंद झाले आहे. कोलव्याच्या नेली रॉड्रिक्स या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर नावेली केंद्रातील उमेदवार हिरमन फर्नांडिस यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्या केंद्राची निवडणूक आता दि. ९ मे रोजी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पी. एम. बोरकर यांनी दिली. पेडणे तालुक्यात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर निघाल्याने येथे सर्वांत जास्त म्हणजे ६५.१८ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
काणकोण तालुक्यात ६० टक्के, सत्तरी ६०.३४, तिसवाडी ५४.३३, सांगे ५३.९०, सासष्टी ५०.८६, केपे ६२.३७, फोंडा ५३.२२, डिचोली ६३.४१, मुरगाव ४९.२७ व बार्देश --- टक्के मतदान झाल्याची माहिती श्री. बोरकर यांनी दिली. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान अतिशय संथ गतीने सुरू झाले. सकाळी १० पर्यंत केवळ १३ टक्के मतदानाची नोंद झाली होती तर, १२ पर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने ५ पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
दरम्यान, वेळ्ळी भागात मतदारांना खूष करण्यासाठी मतदानाच्या आदल्या रात्री चक्क एका मंत्र्याने पैशांचे वाटप करण्याची घटना घडल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश आज निवडणूक आयुक्त पी एम. बोरकर यांनी दिला. या घटनेची सुओमोटु पद्धतीने दखल घेत याची चौकशी करून उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निरीक्षकाला देण्यात आले आहेत. आज काही वर्तमानपत्रांत अशा पद्धतीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहे, असे श्री. बोरकर यांनी सांगितले. वेळ्ळी येथे काल रात्री मतदारांना पैसे वाटण्यासाठी मंत्री आल्याची खबर स्थानिकांना मिळताच त्यांनी त्या मंत्र्याच्या पाठलाग करून तेथून हुसकावून लावले होते. या घटनेनंतर या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
-----------------------

दक्षिण गोव्यात सर्वत्र निरुत्साह
मडगाव,(प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकांत मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला व दक्षिण गोव्यातील एकंदर कल पाहता जवळपास सरासरी ५० टक्के मतदान झाले आहे. नुवे तील काही भाग सोडले तर कुठल्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा आढळल्या नाहीत व त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना विशेष धावपळ करावी लागली नाही. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहिती नुसार कुठेच अनुचित प्रकार घडले नाहीत व त्यामुळे शांततापूर्ण मतदान झाले.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी एकूण २० जागा आहेत पण कोलवातून झालेली अविरोध निवड व उमेदवाराच्या अपघाती मृत्यूमुळे नावेलीतील रहित झालेली निवडणूक यामुळे आज प्रत्यक्षात १८ जागांसाठीच मतदान झाले. एरवी कोणत्याही निवडणुकांसाठी सासष्टीत मतदान वेळेपूर्वीच मतदार रांगा लावत पण त्याला ही निवडणूक अपवाद ठरली .काही ठिकाणी तर मतदान वेळ सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी एकाही मताची नोंद झाली नव्हती.
सकाळी १० वा. नंतर काहीसा जोर आला पण मतपत्रिकांचा वापर असूनही मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या नाहीत. दुपारनंतर अडीच ते साडेतीन या वेळेतही तुरळक प्रमाणात मतदार बाहेर पडले पण ५वा. मतदान संपण्यावेळी तर कुठेच रांग नव्हती व त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना लगेच मतपेट्या सील करून आपले काम आवरते घेणे शक्य झाले.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजीव देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सासष्टीतील टक्केवारी अशी आहे. नुवेः६१.६३,राय-६०.९०, दवर्ली ४०.७७, कुडतरी ४५.९३, गिर्दोळी ५४.६१, चिंचीणी ४३.०५, वेळ्ळी ः५४.६३, बाणावली ः४४.५७ .
नुवे मतदार संघातील फतेपुर,डोंगरी या भागांत सकाळपासूनच मतदानाचा जोर होता व तो दुपारपर्यंत टिकला. पर्यटनमंत्री मिकी पाशेकोसमर्थक व वीज मंत्री आलेक्स सिकेरा यांच्या समर्थकांमध्ये तेथे असलेली अटीतटीची लढत हे या मतदानामागील कारण मानले जाते. असाच प्रकार कुडतरी व वेळ्ळीत दिसून आला.
फातोर्डा स्टेडियमवर तणाव
मतदान आटोपल्यावर आणलेल्या नुवे मतदारसंघातील ८ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याला आपण सील करून आणलेल्या पोत्यात एक रिकामी मतपेटीही घातल्याचे दिसून आले व त्याने पोत्याचे सील खुले करून ती रिकामी मतपेटी बाहेर काढली. तो प्रकार एका उमेदवाराच्या समर्थकाने पाहिला व त्याबाबत उमेदवार मास्कारेन्हस यांनी तक्रार मुख्य अधिकाऱ्याकडे करताच त्यांनी दुसरा उमेदवार डिसा याला बोलावून घेतले व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालून प्रश्र्न सोडविला व परत ती पोती सील केली. पण एव्हाना उभय उमेदवारांचे समर्थक तसेच मंत्री मिकी पाशेको व आलेक्स सिके रा तेथे आले व त्यामुळे वातावरण तप्त होत असल्याचे पाहून पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी लोकांना त्वरित तेथून पांगण्याचा इशारा दिला. त्यामुळे तेथे जमलेल्या बघ्यांची व समर्थकांचीही पांगापांग झाली, त्यातून स्टेडियमवर लाठीमार झाल्याची अफवाही पसरली. पण उमेश गावकर यांनी लाठीमाराचा प्रसंगच उद्भवला नसल्याचे सांगितले.

No comments: