Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 March, 2010

गृहमंत्र्यांनी राजीनामा देणेच योग्य

प्रा. पार्सेकर यांची मागणी
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): राज्यात अंमलीपदार्थ व्यवहार चालत नाहीत, असा उघडपणे दावा करणारे गृहमंत्री रवी नाईक खुद्द पोलिसांनी अंमलीपदार्थ व्यवहारांचा पर्दाफाश केल्याने उघडे पडले आहेत. त्यांनी खरे तर या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज येथे पत्रकार परिषदेत या विषयावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. अंमलीपदार्थ व्यवहारातील माफिया व पोलिस यांचे साटेलोटे उघड झाल्याने या व्यवहाराचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अलीकडेच पाच पोलिसांना निलंबित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण हा प्रकार म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या व्यवहारात वरिष्ठ पोलिस अधिकारी, राजकारणी व त्यांचे सगेसोयरेही गुंतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निःपक्षपाती चौकशीसाठी हे प्रकरण एखाद्या केंद्रीय तपास यंत्रणेकडेच सोपवणे योग्य ठरेल, असेही प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. अंमलीपदार्थ व्यवहाराबाबत भाजपतर्फे वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवण्यात आला. पण सरकारने दरवेळी या गोष्टींकडे कानाडोळा करणेच पसंत केले. यातही कहर म्हणजे खुद्द राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी तर चक्क राज्यात अंमलीपदार्थ व्यवहार नाहीच, असे ठामपणे सांगून टाकले. सरकार या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईत राज्यात अंमलीपदार्थांचा व्यवहार किती फोफावला आहे हे उघड झाले आहे.
सुशेगाद वृत्ती सोडावीच लागेल
राज्यातील किनारी भागांत विशेष करून पेडणे भागातील किनारपट्टीवर विदेशी लोकांचे वास्तव्य वाढत आहे. या ठिकाणी स्थानिकांनी आपला व्यवहार त्यांच्याकडे सोपवला आहे. केवळ काही पैशांसाठी हे लोक आपले अस्तित्वच धोक्यात घालीत आहेत, असे प्रा.पार्सेकर म्हणाले. या प्रकरणी जनजागृतीची गरज असून लोकांना या गोष्टीतील धोक्यांबाबत अवगत करणे गरजेचे आहे. आपण गेल्या एका वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेल्या विदेशींबाबत विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी गृह खात्याने केवळ तीन विदेशी नागरिकांची नावे दिली होती. मुळात आपण केवळ पेडण्यातच साडेतीनशे प्रकरणे दाखवू शकतो, असा दावाही यावेळी प्रा. पार्सेकर यांनी केला. कष्ट न करता केवळ भाड्याच्या रूपाने मिळणाऱ्या पैशांवर धन्यता मानून आपली घरेदारे विदेशींकडे सोपवलेल्या लोकांना या संकटाची माहिती करून देण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली.

No comments: