Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 March, 2010

महागाईविरोधात संसदेला घेरावास गोव्यातून भाजपचे हजार कार्यकर्ते

महिनाभराच्या कार्यक्रमाबाबत मडगाव बैठकीत मार्गदर्शन
मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): भाजपने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या महागाईविरोधी आंदोलनाअंतर्गत येत्या २१ मार्च रोजी संसदेला घेराव घातला जाणार असून त्यात गोव्यातून हजारावर भाजप कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. महागाईविरोधात दोन लाखांवर सह्या जमविण्याचे लक्ष्यही भाजपने ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा भाजपने सदर आंदोलनाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. पक्षाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार दामोदर नाईक, रमेश तवडकर, महादेव नाईक, संघटनमंत्री अविनाश कोळी, विनय तेंडुलकर, राजेंद्र आर्लेकर, नरेंद्र सावईकर, कमलिनी पैंगीणकर, छाया पै खोत व्यासपीठावर उपस्थित होत्या.
पुढे बोलताना पर्रीकर यांनी हा आंदोलन कार्यक्रम जिल्हास्तरावर आयोजित करण्याचे काम संबंधित समित्यांना देण्याचे काम स्तुत्य असल्याचे सांगून पक्षाच्या विस्ताराबरोबर अशा प्रकारे कामे वाटून देण्याची गरज व्यक्त केली. समाजाच्या तळागाळातील व्यक्तींशी संपर्क ठेवण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळेच सासष्टीतील बहुतेक सर्व भागांत पक्षाला स्थान मिळाले असल्याचे ते म्हणाले. आमदाराने घरोघरी भेट देण्याची पद्धत आपण सर्वप्रथम सुरू केली व ती विलक्षण यशस्वी ठरली. या आंदोलनासाठीही तीच योजना अंमलात आणण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या बैठकीत अध्यक्ष पार्सेकर यांनी महागाईविरोधी आंदोलनाची एकंदर रूपरेषा स्पष्ट केली. प्रत्येकाची या आंदोलनातील भूमिका कशी असेल याचे विश्लेषण त्यांनी केले. येत्या चार दिवसांचा आंदोलन कार्यक्रम निश्र्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आजपासून सुरू झालेले हे आंदोलन २१ एप्रिल पर्यंत चालणार असे सांगून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पार्सेकर यांनी केले.
आमदार दामोदर नाईक यांनी आपल्या भाषणात जिल्हापंचायतीच्या निवडणूक निकालांच्या आधारे कॉंग्रेसची तळी उचलून धरणारी प्रसारमाध्यमे लोकांची दिशाभूल करीत असल्याचा ठपका ठेवला. गगनाला भिडलेल्या महागाईस कॉंग्रेस सरकार व त्याचे दलाल जबाबदार असल्याचा आरोप करताना अशा प्रकारे मिळालेला पैसा निवडणुका जिंकण्यासाठी वापरात आणला जातो, असे त्यांनी सांगितले. गोव्यात चालणाऱ्या बेकायदा खाणव्यवसायावरही त्यांनी जोरदार टीका केली. आमदार नाईक यांनी वाढत्या महागाई विरोधात ठराव मांडला व त्याला आमदार महादेव नाईक व कृष्णी वाळके यांनी अनुमोदन दिले. नंतर टाळ्यांच्या गजरात ठराव संमत करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन रुपेश महात्मे यांनी केले.

No comments: