Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 March, 2010

भागू उपासकर खून प्रकरणातूनही महानंद नाईक दोषमुक्त

मडगाव,दि. ६ (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीं गोव्यात खळबळ माजवलेला सीरियल किलर
महानंद नाईक याला भागू उपासकर खून खटल्यातूनही दोषमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्याला सूरत गावकर खटल्यातही निर्दोष ठरवण्यात आले होते.
येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी आज हा निवाडा दिला.
महानंदवर ठेवलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा सादर करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरल्याचे ताशेरे न्यायालयाने तपाससंस्थेवर सूरत गावकर प्रकरणातही याच कारणास्तव तो दोषमुक्त ठरला होता.
भागू उपासकरचा खून २१ ते २२ मार्च २००७ दरम्यान झाला होता. पारोडा येथे चंद्रनाथ पर्वताच्या पायथ्याशी तिचा मृतदेह सापडला होता. प्रथम कोणीच या प्रकरणात खुनाची तक्रार नोंदविली नव्हती. मात्र महानंदचे कारनामे उघडकीस आल्यावर व फोंडा पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याने भागूच्या खुनाचीही कबुली दिली होती.
त्याने आपण तिला पर्वतावर नेले व नंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. तिच्या अंगावरील दागिने घेऊन मृतदेह शेतात टाकून दिला, अशी कबुली पोलिस तपासात दिली होती. नंतर न्यायलयात त्याने याचा इन्कार केला होता.
भागू ही अनिता देसाई हिच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला होती. तिचे लग्न ठरले होते व तिच्या विनंतीवरून अनिताने तिला आपल्या अंगावरील दागिने उसने दिले होते. काम झाल्यावर तिने ते परत करावयाचे होते.
महानंदने विकलेली भागूच्या गळ्यातील साखळी व बांगडी फोंडा येथील एका सोनाराकडून पोलिसांनी जप्त केली होती. तोच या खटल्यांतील महत्त्वाचा पुरावा मानला जात होता. मात्र ते दागिने अनिता देसाई ओळखू शकल्या नाहीत. सरकार पक्षाची ती बाजूही लंगडी पडली. महानंद नाईक याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२,३९२ व २०१(खून, चोरी व पुरावे नष्ट करणे) या कलमांखाली गुन्हे नोंदवले होते. सरकारतर्फे भानुदास गावकर यांनी व न्यायालयाने मोफत कायदा सेवेद्वारे उपलब्ध केलेले ज्यो वाझ यांनी आरोपीतर्फे काम पाहिले.

No comments: