Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 March, 2010

पत्रकारितेचा धर्म मानणारे वृत्तपत्रच राष्ट्रीय : तरुण विजय

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): वृत्तपत्र खपाने मोठे असले तर देशव्यापी ठरते पण ते "राष्ट्रीय' ठरतेच असे नाही. या देशातील ग्रामीण भागांच्या समस्या आणि घटनांना स्थान देणारे छोटे वृत्तपत्र मातीशी इमान राखून पत्रकारितेचा धर्म पाळत असेल, तर तेच खरे "राष्ट्रीय' वृत्तपत्र मानता येईल. "विवेक'ने आपल्या विचारसरणीशी ठाम राहून केलेले प्रबोधन मौलिक आहे, म्हणूनच ते अधिक शक्तिशाली व राष्ट्रीय आहे, असे उद्गार नामवंत पत्रकार तरुण विजय यांनी येथे काढले. सा. विवेकच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आज पाटो येथे म्युझियम सभागृहात झालेल्या "गोवा विकास विशेषांका'च्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आजच्या या प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोशी, गोवा समितीचे अध्यक्ष प्रदीप तळावलीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल खवंटे, विवेकचे प्रबंधक संपादक दिलीप करंबेळकर, राजू सुकेरकर, प्रा. दत्ता भि. नाईक, प्रा. सुभाष वेलिंगकर, सूर्यकांत गावस व वल्लभ केळकर उपस्थित होते.
सध्या सर्वत्र "पेड न्यूज'ची चर्चा समाजात होत आहे. बातमी देणाऱ्यांकडून पैसे घेणे अथवा पैसे न देणाऱ्यांविरुद्ध मजकूर प्रसिद्ध करणे अशी धोकादायक वृत्ती देशभर पसरत चालली आहे. दंगली उसळल्या की पूर्वग्रहदूषित एकतर्फी बातम्या देण्यात देश पातळीवरील वृत्तपत्रे धन्यता मानतात. या प्रकाराला ते धर्मनिरपेक्षतेचे नाव देतात. वृत्तपत्रसृष्टीत सध्या बेईमानी विरुद्ध इमानदारी, धर्म विरुद्ध अधर्म असा संघर्ष चालू आहे. वृत्तपत्र छोटे असले तरी धर्माच्या बाजूने राहिल्यास ते टिकून राहते, जनमानसात स्थान प्राप्त करते, असे ते म्हणाले. भगतसिंग यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणारे ८४ जण विस्मरणात गेले पण भगतसिंग मात्र अमर झाले आहेत. वृत्तपत्रांची आजची अवस्था छोट्यामोठ्या राजकीय पक्षांसारखी झाली आहे. मोठी वृत्तपत्रे कोट्यवधी कमावतात मात्र गुंतवणूक अन्य उद्योगांत करतात. हे प्रसार माध्यमाला हानिकारक आहे, असे ते म्हणाले. केवळ नागरी समस्यांवर भर न देता सामान्यांप्रति आत्मीयता असल्यास वृत्तपत्रे टिकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रदीप तळावलीकर व प्रा.दत्ता भि.नाईक यांनी "गोवा विशेषांका'विषयी माहिती दिली. दिलीप करंबेळकर यांनी विवेकच्या एकंदरीत वाटचालीचा आढावा घेताना, हिंदू समाजाला धैर्य देण्याचे काम विवेकने वेळोवेळी केल्याचे सांगितले. विवेकतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. अनिल खवंटे यांनी विवेकची प्रशंसा करताना यापुढेही आपले सहकार्य देण्याची ग्वाही दिली. चैताली गावस हिने प्रारंभी ईशस्तवन व समारोपप्रसंगी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत सादर केले.

No comments: