Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 March, 2010

महागाईविरोधात भाजप फुंकणार राज्यव्यापी रणशिंग

- १० रोजी उत्तर व दक्षिण गोव्यात बैठका
- ११ ते १४ पर्यंत प्रत्येक मतदारसंघात बैठका
- १५ मार्चपासून जाहीर सभा व आंदोलनाला सुरुवात
- २१ एप्रिल रोजी दिल्लीत संसदेला घेराव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात गेल्या काही वर्षांत महागाईने जे भीषण स्वरूप प्राप्त केले आहे, त्यामुळे देशातील समस्त गरीब व मध्यमवर्ग पिंजून गेला आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगानेच १० मार्च ते १० एप्रिलपर्यंत गोवा प्रदेश भाजपतर्फे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष उल्हास अस्नोडकर, सरचिटणीस गोविंद पर्वतकर व भाजपच्या महिला नेत्या कुंदा चोडणकर हजर होत्या. महागाईविरोधातील या आंदोलनाद्वारे राज्यभरातून सुमारे दोन लाख सह्या मिळवण्यात येतील. यासंदर्भात येत्या १० मार्च रोजी उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ४.३० वाजता म्हापसा येथील हॉटेल त्रिमूर्ती व दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी मडगाव येथे संध्याकाळी ६.३० वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पूर्ण आंदोलनाची व्यूहरचना आखली जाईल. या दोन्ही बैठकांना संबंधित जिल्ह्यातून किमान शंभर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ११ ते १४ असे चार दिवस प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे व त्यात मतदारसंघनिहाय कार्यक्रमाची आखणी केली जाईल. राज्यातील १८९ पंचायती, १३ पालिका व १ महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी महागाईच्या रौद्ररूपाबाबत जनजागृती केली जाईल. १५ मार्चपासून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होईल व त्यात जाहीर सभा, कोपरा सभा, पुतळा जाळणे, घंटानाद, महिलांतर्फे भांडीनाद व महागाईप्रकरणी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली जाणार आहेत. या सरकारने महागाई वाढवण्यास कसा हातभार लावला याची माहितीही यावेळी जनतेला करून दिली जाणार आहे.
२१ एप्रिल रोजी देशभरातून भाजपतर्फे सुमारे पाच लाख लोक संसदेला घेराव घालतील. या कार्यक्रमासाठी गोव्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी पार्सेकर यांनी दिली.
केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली. सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने जगावे कसे, असा प्रश्न लोकांसमोर उभा ठाकला आहे.
येत्या २२ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महागाईवरून संपूर्ण राज्यभरात रणशिंग फुंकले जाईल व तदनंतर सभागृहातही या विषयावरून सरकारला चांगलेच धारेवर धरणार असेही प्रा. पार्सेकर म्हणाले. महागाईबरोबर भ्रष्टाचार, बेकायदा खाणी, अंमलीपदार्थांचा व्यवहार आदी सर्व विषयांवरून सभागृह दणाणून सोडू, अशीही माहिती त्यांनी दिली.

No comments: